Sanjay Raut | हे तर जो बायडेनचं घरही ताब्यात घेतील, एकनाथ शिंदे गटाच्या दाव्यांवर संजय राऊतांची टोलेबाजी

| Updated on: Jul 20, 2022 | 11:06 AM

शिवसेनेतून बाहेर पडलेले आमदार आणि खासदार शिवसेनेतील फुटीसाठी संजय राऊत जबाबदार असल्याचं वारंवार सांगत आहेत. यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, ' 2014 साली संजय राऊत कुठे होते. जेव्हा भाजपने युती तोडली. तेव्हा राऊत त्या चित्रात कुठे होते...

Sanjay Raut | हे तर जो बायडेनचं घरही ताब्यात घेतील, एकनाथ शिंदे गटाच्या दाव्यांवर संजय राऊतांची टोलेबाजी
Image Credit source:
Follow us on

नवी दिल्ली: शिवसेनेतून बाहेर पडलेला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गट आता शिवसेना पक्षावर दावा ठोकण्याची चर्चा आहे. शिवसेना भवनावरही ते दावा ठोकू शकतील, असंही बोललं जात आहे. यावरून संजय राऊत (sanjay Raut) यांनी आज जोरदार टोलेबाजी केली. फुटीर गटाचं काय सांगता, ते चंद्रावरही कार्यलय स्थापन करतील, शिवसेना भवनच (shivsena Bhavan) काय सामना आणि मातोश्रीचाही ताबा मागतील, असं वक्तव्य राऊत यांनी केलं. नवी दिल्लीत आज संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. राऊत यांना आज ईडीचं समन्स आलेलं असून त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. मात्र संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु असल्यामुळे आपण पुढची तारीख घेणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं. तसेच आज सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्या परस्पर विरोधी याचिकांवरील सुनावणी होणार आहे. आम्हाला न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास असून लोकशाहीचा खून घटनापीठासमोर होणार नाही, अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली.

हे जो बायडेनचं घरही ताब्यात घेतील…

एकनाथ शिंदेंच्या गटाने लोकसभेत राहुल शेवाळेंना गटनेता करा, अशी मागणी केली आहे. तसेच शिवसेना भवनावरही ते दावा सांगण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘ फुटीर गट चंद्रावरही कार्यालय स्थापन करेल, एवढे हवेत आहेत. शिवसेना भवन, सामना मातोश्रीचा ताबा हवा आहे. अशा प्रकारे एक दिवस ते जो बायडनचं घरही ताब्यात घेतील. 10 डाऊनिंग स्ट्रीटला जातील. तिथेही ताबा घेतील. एवढा मोठा पक्ष आहे त्यांचा… बाळासाहेब ठाकरेंचा मुळ पक्ष आमचाच आहे. किंबहुना आम्हीच त्यांना पक्षात आणलंय, असंही सांगायला हे कमी करणार नाहीत. उद्धव ठाकरे यांना आम्हीच पक्षप्रमुख केलं.. असंही म्हणतील. महाराष्ट्रात लोकशाहीचं जे चित्र दिसतंय, त्याबद्दल विचारही करू शकत नाही. त्यांनी जी लढाई लढायची आहे, ती लढू द्या. 12 खासदारांचा फुटीर गट भाजपच्या प्रेरणेनं आम्हाला सोडून गेला. ते कालपर्यंत आमचे मित्र होते. आजही मी त्यांना मित्र मानतो. कोणत्या मजबुरीतून त्यांनी आम्हाला सोडलंय हे आम्हाला माहिती आहे. प्रत्येकाची वेगळी मजबुरी आहे. हिंदुत्व, युती हे तोंडी लावायला आहे…

दानवे भ्रमिष्ट आहेत…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान, २०१९ मध्ये युतीचा जो फॉर्मुला ठरला, त्यावर रावसाहेब दानवे यांनी आज वक्तव्य केलं. ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलं असताना उद्धव ठाकरेंनी आपली बाजू पलटली, असा आरोप दानवेंनी केला. संजय राऊत यांनी दानवेंच्या या वक्तव्यावरून त्यांना चांगलंच सुनावलं.. ते म्हणाले, ‘ असा कोणताही फॉर्रम्युला ठरला नव्हता. हॉटेल ब्लू सी परळीच्या पत्रकार परिषदेत अमित शहा यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं निवेदन ऐकलं असेल.. तर रावसाहेब दानवे कुठेतरी पाताळात फिरतायत, पृथ्वीवर यायचे आहेत, असं दिसेल… स्वतः अमित शहा आणि फडणवीसांनी 50-50 टक्के सत्ता वाटपाचा फॉर्म्युला सांगितला होता. दानवे माझ्या बाजूलाच राहतात, त्यांना ती क्लिप पाठवतो.

संजय राऊतच जबाबदार…?

शिवसेनेतून बाहेर पडलेले आमदार आणि खासदार शिवसेनेतील फुटीसाठी संजय राऊत जबाबदार असल्याचं वारंवार सांगत आहेत. यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, ‘ 2014 साली संजय राऊत कुठे होते. जेव्हा भाजपने युती तोडली. तेव्हा राऊत त्या चित्रात कुठे होते… 2019 साली भाजपने दिलेला पक्ष कुठे होते, याचं उत्तर त्यांनी द्यावं… या काळात घडलेल्या घटनांना जबाबदार कोण, याचं उत्तर त्यांनी द्यावं. उद्धव ठाकरे यांच्यावर शिवराळ भाषेत चिखलफेक भाजपकडून झाली, त्याला संजय राऊत जबाबदार आहेत का… रावसाहेब दानवे हे आज जालन्याचे खासदार आहेत. २०२४ ला ते असतील की नाही, या भ्रमिष्ट अवस्थेत ते आहेत. म्हणून त्यांना असे काहीतरी विषय सूचत आहेत.