…तरीही भाजप पुढार्‍यांच्या डोक्यातील बटाट्यांना अकलेचे कोंब फुटू नयेत याचंच आश्चर्य वाटतं, सामनातून टीकेचा बाण

| Updated on: Jul 16, 2021 | 7:08 AM

पंढपूरच्या वारीसाठी परवानगी द्या, असं टुमणं लावून वारकऱ्यांना भडकावणारे भाजप नेते यातून काही शिकणार आहेत की नाहीत?, असा सवाल सामना अग्रलेखातून विचारण्यात आलाय. 

...तरीही भाजप पुढार्‍यांच्या डोक्यातील बटाट्यांना अकलेचे कोंब फुटू नयेत याचंच आश्चर्य वाटतं, सामनातून टीकेचा बाण
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत.
Follow us on

मुंबई : “पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात लोकांना सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत… सर्वोच्च न्यायालयात हे वारंवार सांगावे लागत आहे… पंतप्रधान बोलत आहेत… तरीही महाराष्ट्रातील भाजप पुढारी पंढपूरच्या वारीसाठी परवानगी द्या, असं टुमणं लावून वारकऱ्यांना भडकावित आहे. सुप्रीम कोर्ट आणि पंतप्रधानांनी सांगूनही भाजप पुढाऱ्यांच्या डोक्यातील बटाट्यांना अकलेचे कोंब फुटू नयेत याचंच आश्चर्य वाटतं”, असा टीकेचा बाण आजच्या सामना अग्रलेखातून भाजप पुढाऱ्यांवर सोडण्यात आलाय. (Shivsena Sanjay Raut Slam BJP Maharashtra leader through Saamana Editorial Over Pandharpur Wari)

वारकऱ्यांना भडकावणारे भाजप नेते यातून काही शिकणार आहेत की नाहीत?

अग्रलेखात उत्तराखंड-उत्तर प्रदेशमधल्या कावड यात्रेचा संदर्भ देताना “दोन्ही भाजपशासित राज्य असताना देखील एका मुख्यमंत्र्यांनी कावड यात्रेला परवानगी दिली तर उत्तर प्रदेशातील कावड यात्रेची दखल घेऊन शेवटी सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला… मग पंढपूरच्या वारीसाठी परवानगी द्या, असं टुमणं लावून वारकऱ्यांना भडकावणारे भाजप नेते यातून काही शिकणार आहेत की नाहीत?”, असा सवाल विचारण्यात आलाय.

तर अशा लोकांवर गंगामाईचा कोप झाल्याशिवाय राहणार नाही…

“पंढरपूरची वारी असेल नाहीतर हरिद्वारची कावड यात्रा… भक्तांचे प्राण महत्त्वाचे आहेत. देवाच्या दरबार राज्यकर्त्यांना जाब द्यावा लागेल… भारतीय पक्ष भारतीय जनता पक्षाची तडफड आणि तगमग आपण समजू शकतो… त्यांना फक्त लोकांची डोकी भडकावून राजकारण करायचे आहे… सुप्रीम कोर्टापासून पंतप्रधान मोदींपर्यंत सगळ्यांचे म्हणणे आहे की, निर्बंध पाळा… तिसऱ्या लाटेपासून सावध राहा पण महाराष्ट्र भाजपचे राजकारण दुसर्‍या टोकाचे… ते सुप्रीम कोर्ट व पंतप्रधानांनाही जुमानत नाही असे दिसते… गंगेच्या प्रवाहात श्रद्धाळूंचे मृतदेह वाहातच रहावेत हीच त्यांची भावना असेल तर गंगामाईचा कोप अशा लोकांवर झाल्याशिवाय राहणार नाही…”

उत्तर प्रदेश-उत्तराखंडमधील कावड यात्रा, सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप

“कोरोनाच्या तिसरा लाटेचा धोका असतानाही कावड यात्रेला योगी आदित्यनाथांनी परवानगी दिली.. त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने उत्तरप्रदेश सरकारला झापले आहे…. कावड यात्रा हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे हे मान्य पण कुंभमेळ्यापासून कावड यात्रेपर्यंत गर्दीचा पूर येतो… त्या पुरात शेवटी भक्तांची प्रेते वाहताना दिसतात… उत्तराखंड सरकारने कोरोना काळात कावड यात्रेवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला… दोन्ही भाजपशासित राज्य असून दोघांच्या दोन तऱ्हा दिसत आहेत पण उत्तर प्रदेशातील कावड यात्रेची दखल घेऊन शेवटी सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला हे महत्त्वाचे…”

महाराष्ट्रातील भाजपा पुढारी यातून काही शिकणार आहेत की नाहीत?

“महाराष्ट्रातील भाजपा पुढारी यातून काही शिकणार आहेत की नाहीत? पंढरपूरच्या वारीला परवानगी द्या असे टुमणे ते लावत आहेत व वारकरी संप्रदायातील काही जाणत्या मंडळींना भरीस घालून वाढीसाठी आंदोलने घडवीत आहेत… लोकांच्या जीवाशी खेळण्याचे हे अघोरी प्रकार आहेत… महाराष्ट्र सरकारने श्रद्धा व भावनेच्या आहारी जाऊन माऊलींच्या वारीची परवानगी दिली असती तरी सुप्रीम कोर्टाने त्या निर्णयात हस्तक्षेप केला असता हे उत्तर प्रदेश मधील घटनेवरून स्पष्ट दिसते.”

मग धामी हिंदुविरोधी आहेत असा ठपका ठेवून त्यांना हाकलण्याची मागणी करणार काय?

“पंढरपूरची वारी हा जसा श्रद्धेचा विषय तसे उत्तर प्रदेश, उत्तराखंड मध्ये कावडयात्रेचे महत्त्व आहे… आता त्यात श्रद्धांचा मान ठेवून भाजपचे लोक कावड यात्रेला परवानगी द्या नाही तर आंदोलन करु अशा धमक्या देणार आहेत की काय? ही धमकी एकतर सुप्रीम कोर्टाला असेल नाहीतर थेट पंतप्रधान मोदींना असेल… उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी त्यांनी कावड यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला… हा त्यांचा अनुभव आणि शहाणपण आहे… मग धामी हिंदुविरोधी आहेत असा ठपका ठेवून धामींना हाकला अशी मागणी कोण करणार आहेत काय?”

सुप्रीम कोर्टाचे निर्देश काय?

“सुप्रीम कोर्टाने स्पष्टच सांगितले आहे की उत्तर प्रदेश सरकारचा कावड यात्रेस परवानगी देण्याचा निर्णय धोकादायक आहे… कोरोना संदर्भात जराही ढिलाई आणि तडजोड चालणार नाही…”

…तर गंगामातेचा कोप झाल्याशिवाय राहणार नाही..

“कावड यात्रा पवित्र गंगा आणि गंगाजलाची संबंधित आहे… हजारो श्रद्धाळू या काळात कावडी घेऊन हरिद्वारला येतात व गंगाजल भरुन आपापल्या गावातील मंदिरात नेतात… कावड यात्रा ही हजारो वर्षांची धार्मिक परंपरा आहे… हिंदूंच्या भावना त्यात गुंतल्या आहेत… हे खरे पण सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचे निर्बंध तोडून हरिद्वारला गर्दी केली तर गंगामातेचा कोप झाल्याशिवाय राहणार नाही…”

पंढरपूरची वारी असेल नाहीतर हरिद्वारची कावड यात्रा, भक्तांचे प्राण महत्वाचे

“याच गंगेने हजारो कोरोनाग्रस्तांची प्रेते पोटात घेऊन अश्रू ढाळले आहेत… दुसऱ्या लाटेच्या तडाख्याने समाज हादरुन गेला आहे… तिसऱ्या लाटेने पूर्ण उद्ध्वस्त होऊन कोलमडू नये… पंढरपूरची वारी असेल नाहीतर हरिद्वारची कावड यात्रा, भक्तांचे प्राण महत्वाचे…. देवाच्या दरबारात राज्यकर्त्यांना जाब द्यावा लागेल…”

(Shivsena Sanjay Raut Slam BJP Maharashtra leader through Saamana Editorial Over Pandharpur Wari)

हे ही वाचा :

‘…तर महाराष्ट्राचं किती कौतुक व्हायला हवं याचा विचार करतोय’, जयंत पाटील यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

‘महाविकास आघाडीतील ‘शिक्षणसम्राट’ मंत्र्यांनी फी सवलतीचा निर्णय हाणून पाडला’, भातखळकरांचा खोचक टोला