मोठी बातमी! मनसे-ठाकरे गटाच्या नेत्यांची एकत्र पत्रकार परिषद; नेमकं काय बोलणार?

मनसे आणि ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेत उद्या (25 जून) एकत्र पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत दोन्ही नेते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

मोठी बातमी! मनसे-ठाकरे गटाच्या नेत्यांची एकत्र पत्रकार परिषद; नेमकं काय बोलणार?
Shivsena mns Press
| Updated on: Jun 24, 2025 | 8:49 PM

राज्यात गेल्या काही काळापासून मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीबाबत चर्चा चालू आहे. दोन्ही बाजूंनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यानंतर आता मनसे आणि ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेत उद्या (25 जून) एकत्र पत्रकार परिषद घेणार आहेत. अर्थात ही पत्रकार परिषद युतीसंदर्भातील चर्चेवर नसली तरी दोन्ही पक्षांचे नेते त्यानिमित्ताने एकत्र येणार असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच या पत्रकार परिषदेत दोन्ही नेते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनसे आणि ठाकरे गट उद्या 24 जूनला एकत्र पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई संबोधित करणार आहेत. इंडिगो एअरलाइन्स कर्मचाऱ्यांबाबत भाजपच्या कामगार युनियनने केलेला खोटारडेपणा हे दोन्ही नेते उघड करणार आहेत. उद्या दुपारी ठीक 12.30 वाजता ही पत्रकार परिषद पार पडणार आहे.

आठवडाभरापूर्वी एकत्र आंदोलन

मनसे आणि ठाकरे गटाने इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात 18 जूनला एकत्र आंदोलन केले होते. प्रादेशिक मुंबईतील कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात खासदार अरविंद सावंत हे सहभागी झाले होते. या आंदोलनात मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा का सुरु झाली?

चित्रपट अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत राज यांनी मनसे-शिवसेनेच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना राज यांनी, ‘एकत्र येऊन राहणे मला कठीण वाटत नाही. महाराष्ट्रातील मराठी लोकांच्या अस्तित्वासाठी आमचे वाद आणि भांडणे खूपच लहान आहेत’ असे विधान केले होते. तेव्हापासून या युतीची चर्चा सुरु झाली.

यानंतर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया देताना, मी छोटे छोटे वाद बाजूला ठेवण्यास तयार आहे, महाराष्ट्रातील लोकांना जे हवे आहे ते होईल असं म्हटलं होतं. त्यामुळे या युतीच्या चर्चांना अधिक जोर आला. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या काही नेत्यांच्या कार्यक्रमांमध्ये भेटीगाठीही झाल्या. मात्र अजून युतीचा निर्णय अंतिम झालेला नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us