Rupali Patil : ..तर त्यांची जीभ छाटली पाहिजे, शिवरायांवरील वक्तव्यावरुन रुपाली पाटील आक्रमक, भाजप नेत्यांना आवर घालण्याचा दिला इशारा

Rupali Patil : शिवरायांवरील वक्तव्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया..

Rupali Patil : ..तर त्यांची जीभ छाटली पाहिजे, शिवरायांवरील वक्तव्यावरुन रुपाली पाटील आक्रमक, भाजप नेत्यांना आवर घालण्याचा दिला इशारा
तर जीभ छाटली पाहिजे
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Dec 04, 2022 | 6:03 PM

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरु आहे. महाराजांबद्दल वक्तव्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी संतप्त प्रतिक्रया दिली आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांची जीभ छाटली पाहिजे, असा वक्तव्य त्यांनी केले. लाड यांना शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती नसेल तर तो त्यांनी माहिती करावा. सतत बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांची जीभ छाटली जावी, अशी संतप्त प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवर घालण्याचा इशारा त्यांनी दिला.

शिवरायांबद्दल वादाची मालिका काही खंडीत होत नसल्याने राज्यभर संतापाचे वातावरण आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर असे वक्तव्य करण्याची स्पर्धाच सुरु झाली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील नेते एकामागून एक वादग्रस्त वक्तव्य करत आहेत.

शिंदे यांच्या बंडाशी, त्यांच्या सुरत आणि गुवाहाटी दौऱ्याशी महाराजांच्या आग्रा सूटकेचा संदर्भ देण्यात येत आहे. राज्यपालांनी तर शिवाजी महाराज जून्या जमानाचे आता गडकरी आदर्श असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. औरंगाबाद येथील कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले होते.

राज्यभरात काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट, मराठा संघटनांनी याविरोधात आवाज उठविला. संभाजी राजे, उदयनराजे यांनी राज्यपालांविरोधात कडक भूमिका घेतली. पण वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरुच आहे.  सरकारमधील नेते, आमदार वाद ओढावून घेत आहेत.

प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला व त्यांचे बालपण रायगडावर गेल्याचे वक्तव्य करुन वाद ओढावून घेतला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात संतापाचे वातावरण आहे. उठसूट वादग्रस्त वक्तव्य होत असल्याने विरोधकांनी नाराजी  व्यक्त केली आहे.

लाड हे विकृत इतिहास मांडत आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्यांची जीभ छाटली पाहिजे, तुमचा कडेलोट केला पाहिजे असे वक्तव्य रुपाली पाटील यांनी केले. भाजपचे नेते जाणून-बुजून महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला.