स्पेशल रिपोर्ट : वांद्रे ते वरळी, आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघ कोण सोडणार?

| Updated on: May 28, 2019 | 10:37 AM

Aditya Thackeray मुंबई :  ठाकरे घराण्याची चौथी पीढी आता सक्रिय राजकारणातून संसदीय राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही चर्चा बळावली आहे. सत्तेच्या राजकारणात पूर्वी ठाकरेंचा रिमोट कंट्रोल चालायचा. आता बाहेरुन कंट्रोल ठेवण्यापेक्षा, थेट संसदीय राजकारणात येण्याची ठाकरेंच्या चौथ्या पीढीची महत्वाकांक्षा […]

स्पेशल रिपोर्ट : वांद्रे ते वरळी, आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघ कोण सोडणार?
Follow us on

Aditya Thackeray मुंबई :  ठाकरे घराण्याची चौथी पीढी आता सक्रिय राजकारणातून संसदीय राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही चर्चा बळावली आहे.

सत्तेच्या राजकारणात पूर्वी ठाकरेंचा रिमोट कंट्रोल चालायचा. आता बाहेरुन कंट्रोल ठेवण्यापेक्षा, थेट संसदीय राजकारणात येण्याची ठाकरेंच्या चौथ्या पीढीची महत्वाकांक्षा आहे. होय, आदित्य ठाकरेंना संसदीय राजकारणात रस आहे. म्हणूनच विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पर्यावरण, शिक्षण, खेळ आणि सामाजिक उपक्रमांमध्ये ते विशेष रुची दाखवतात. अलीकडे संसद आणि विधीमंडळाच्या अधिवेशनात पाहुणे म्हणून त्यांची आवर्जून उपस्थिती पाहायला मिळते.

युवासेनाप्रमुख म्हणून शिवसेनेच्या सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यानंतर आता पक्षात अगदी तरुण वयात त्यांना नेतेपदी बढतीही मिळाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबर ते NDA च्या बैठकांना उपस्थित राहातात. पक्षाची ध्येयधोरणे, कार्यक्रम, संकल्पना, दिशा ठरवताना आदित्य यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. आदित्य यांनी केंद्रीय राजकारणात छाप पाडावी अशी भूमिका असलेला एक मतप्रवाह शिवसेनेत आहे. त्यामुळे ते लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा काही दिवसांपूर्वी सुरु झाली होती. ते घडलं नाही, मात्र उद्धव ठाकरे यांनी आदित्य विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसतील असे संकेत त्यावेळी दिले होते.

गेल्या वर्षभरापासून आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुरक्षित मतदार संघाची चाचपणी सुरु आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार –

जोगेश्वरी, ते स्वतः राहात असलेला वांद्रे पूर्व येथील खेरवाडी, माहीम, वरळी आणि शिवडी या मतदारसंघाचा प्रामुख्याने विचार झाला.

लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या आकडेवारीनंतर वरळी आणि माहीम या दोन मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा आहे. वरळीत सुनील शिंदे आणि माहिममध्ये सदा सरवणकर हे पक्षाचे आमदार आहेत.

आदित्य ठाकरेंची राजकीय कारकीर्द

2003 मध्ये आदित्य ठाकरेंना भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारी देण्यात आली. मनसेच्या स्थापनेनंतर विद्यार्थी सेनेच्या जागी युवासेनेची स्थापना त्यांनी केली. मुंबईतील नाईट लाईफ आणि रूफ टॉप हॉटेलच्या परवानगीसाठी आदित्य आग्रही आहेत. राणीच्या बागेत पेंग्विन यावेत यासाठी ते आग्रही होते. मरीन लाईन्स, वडाळा येथे त्यांनी खुले जिम सुरू केले.

युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी आदित्य ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी जाहीर मागणी सोशल मीडियात केली आहे. तर भाजपच्या केंद्रीय पक्षश्रेठींचंही आदित्यनं संसदीय राजकारणात यावं असा आग्रह आहे. यापूर्वी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘या मला तुमच्याशी काही बोलायचे आहे’ अशी साद कार्यकर्त्याना घालत, विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. मात्र नंतर राजकीय डावपेचातील संभाव्य धोके लक्षात घेत त्यांनी आपली घोषणा मागे घेतली होती. आता आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चेनं पुन्हा एकदा उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.