पंतप्रधान मोदींनी देशात योग्य नियोजन केले असते तर…, बच्चू कडूंचा केंद्रावर हल्लाबोल

| Updated on: May 13, 2021 | 6:52 AM

देशात जर योग्य नियोजन झाले असते तर आज हे दिवस आपल्याला पाहायला मिळाले नसते," असा जोरदार हल्लाबोल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला. (Bacchu Kadu Criticizes PM Narendra Modi)

पंतप्रधान मोदींनी देशात योग्य नियोजन केले  असते तर..., बच्चू कडूंचा केंद्रावर हल्लाबोल
राज्यमंत्री बच्चू कडू- पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

अहमदनगर : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या भूमिका बजावायला पाहिजे होत्या, त्या त्यांनी बजावल्याच नाही. त्यामुळे आज जी आपत्ती आली आहे ती देशासोबत राज्यावर येऊन पडली आहे. देशात जर योग्य नियोजन झाले असते तर आज हे दिवस आपल्याला पाहायला मिळाले नसते,” असा जोरदार हल्लाबोल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला.  (State Minister Bacchu Kadu Criticizes PM Narendra Modi And Devendra Fadnavis)

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काल (12 मे) अहमदनगरला प्रहार कोव्हिड सेंटरची पाहणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. त्यासोबतच राज्यातील लसीच्या तुटवड्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला.

महाराष्ट्रात राहून टीका करण्यापेक्षा तुम्ही काय आणलात ते सांगा 

देवेंद्र फडणवीस हे भाजपचे प्रमुख आहेत ते मोदींकडे गेले का? आम्हाला लसीकरण जास्त द्या किंवा इतर साहित्य द्या असे एक तरी निवेदन त्यांनी पंतप्रधानांना दिले का? असा सवाल बच्चू कडूंनी उपस्थित केला आहे. तसेच महाराष्ट्रात राहून सरकारवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा ते केंद्रातून काय आणू शकले याचे उदाहरण देवेंद्रजींनी द्यावे, मग त्यांना बोलायचा अधिकार आहे, असा टोला त्यांनी लगावला.

केंद्राने महाराष्ट्राला सर्वात जास्त लस दिल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. देवेंद्रजी तुम्ही आकडे समोर घेऊन बसलात तर तुमच्या लक्षात येईल, असे प्रत्युत्तर बच्चू कडूंनी केले.

इतर राज्यापेक्षा आपली स्थिती बरी

केंद्राकडून जे काही मिळते त्यात दुजाभाव होतोय. त्यावर आम्ही बोललो, पण कुठल्या वादात पडलो नाही. आज देशात सर्वात चांगले व्यवस्थापन हे महाराष्ट्रात केलं जातं आहे. तसेच मुंबईचे तर जागतिक पातळीवर कौतुक होतं आहे. जरी केंद्र सरकार दुजाभाव करत असेल तरी राज्य मात्र खंबीर आहे. सध्या इतर राज्यापेक्षा आपली स्थिती बरी आहे, असेही बच्चू कडू म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी योग्य भूमिका बजावली नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एक महिना अगोदर स्टेटमेंट पहिल तर देशातून कोरोना गेल्याचं ते बोलले होते. एक महिन्यानंतर कोरोना जगाच्या पाठीवर सर्वात जास्त आपल्या देशात आहे. पंतप्रधान म्हणून त्यांनी ज्या भूमिका बजावायला पाहिजे होत्या त्या त्यांनी बजावल्याच नाही. त्यामुळे आज जी आपत्ती आली आहे ती देशासोबत राज्यवर येऊन पडली. देशात जर नियोजन झाला असतं, तर आज हे दिवस आपल्याला पाहिला मिळाले नसते, असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं आहे. (State Minister Bacchu Kadu Criticizes PM Narendra Modi And Devendra Fadnavis)

संबंधित बातम्या : 

बालपणी बाळासाहेब ठाकरेंनी डोक्यावर हात ठेवला, आता पवारांचे आशीर्वाद; आमदार लंकेंची चर्चा तर होणारच!

कोरोना प्रतिबंधक लसीचे ‘राष्ट्रीय धोरण’ जाहीर करा; नाना पटोलेंचा मोदी सरकारला सल्ला