Supriya Sule : “बहोत हो गया, राज्यपालांना उत्तराखंडला परत पाठवा”, सुप्रिया सुळे आक्रमक

Bhagat Singh Koshyari Statment : राज्यपालांचं आक्षेपार्ह विधान, सुप्रिया सुळे आक्रमक

Supriya Sule : बहोत हो गया, राज्यपालांना उत्तराखंडला परत पाठवा, सुप्रिया सुळे आक्रमक
| Updated on: Jul 30, 2022 | 12:18 PM

मुंबई : “राज्यपाल हे पद संविधानिक आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलणं उचित नाही. पण माहाराष्ट्राचे राज्यपाल सतत वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलण्याची वेळ येते. त्यांच्या या विधानाचा मी निषेध करते. राज्यात आपण सगळ्या समाजाचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतो. पण समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असं विधान राज्यपाल करत आहेत. हे योग्य नाही. बहोत हो गया, राज्यपालांना उत्तराखंडला परत पाठवा”, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि मुंबईबाबत केलेल्या विधानावर (Bhagat Singh Koshyari Statment) संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी त्यांच्या या विधानाचा निषेध केला आहे. मुंबई आमचा प्राण आहे, त्याबाबात एकही अपशब्द ऐकून घेणार नाही, अशी भूमिका राजकीय नेत्यांनी आणि सामाजिक क्षेत्रातील नेत्यांनी घेतली आहे. यावरून सगळ्याच पक्षाचे नेते आक्रमक झाले आहेत.

राज्यपाल नेमकं काय म्हणाले?

“मुंबईत बाहेरून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. काम धंदा, व्यवसाय करण्यासाठी तसेच नाव कमावण्यासाठी अनेक जण स्वप्नाची नगरी मुंबईमध्ये येतात आणि मुंबईत आपली स्वप्नं पूर्ण करतात, म्हणूनच मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटलं जातं. मात्र राज्यपालांनी यावेळी बोलताना, कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही”, असं राज्यपाल म्हणाले आहेत. “ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही”, असंही राज्यपाल म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानावर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. आज एक वाजता ही पत्रकार परिषद होणर आहे. खासदार संजय राऊत यांनी याबाबत ट्विट केलं आहे. “राज्यपाल महोदयांच्या बेताल विधानाचा समाचार घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद-आज दुपारी मातोश्री येथे1 वाजता”, असं ट्वि़ट राऊतांनी केलं आहे.

कोश्यारींचा राजीनामा घ्यावा- राऊत

राष्ट्रवादी आणि मनसेने या विधानावरून राज्यपालांना खडेबोल सुनावले आहेत. तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका करतानाच शिंदेगट आणि भाजपची कान उघाडणी केली आहे. राऊतांनी एकापाठोपाठ चार ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. राज्यात भाजप पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला आहे. थोडा जरी स्वाभिमान आणि अभिमान असेल तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा घ्या. अथवा शिवसेनेचं नाव घेऊ नका, अशा शब्दात राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.