अब्दुल भाई, संदिपान भैय्यांना भेटण्याची उत्सुकता, बहिणीचं स्वागतच करतील, 2023 ची वाट पहा! सुषमा अंधारे यांचा मोठा दावा

| Updated on: Nov 18, 2022 | 2:21 PM

अब्दुल सत्तार हे सिल्लोड येथील तर संदीपान भूमरे हे पैठण येथील आमदार आहेत. औरंगाबादमधील शिंदे गटातील ते महत्त्वाचे नेते आहेत.

अब्दुल भाई, संदिपान भैय्यांना भेटण्याची उत्सुकता, बहिणीचं स्वागतच करतील, 2023 ची वाट पहा! सुषमा अंधारे यांचा मोठा दावा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दत्ता कनवटे, औरंगाबादः शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची महाप्रबोधन यात्रा (Maha prabhodhan Yatra) सध्या औरंगाबादेत दाखल झाली आहे. पुढील तीन दिवस ठिकठिकाणी त्यांच्या सभा होती. या पार्श्वभूमीवर टीव्ही9 ने त्यांची प्रतिक्रिया आणि सभांचा अजेंडा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सुषमा अंधारे या महाप्रबोधन यात्रेतून वारंवार शिंदे गटाविरोधात (CM Eknath Shinde) टीकास्त्र डागत आहेत. आता तर त्यांच्या निशाण्यावर सतत असलेल्या अब्दुल सत्तार यांच्या जिल्ह्यात महाप्रबोधन यात्रा पोहोचली आहे. त्यामुळे सभांतून सत्तार यांचा त्या समाचार घेणार का, असा सवाल विचारला जातोय. सुषमा अंधारे यांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली.

मी औरंगाबादला आल्यामुळे अब्दुल भाई आणि संदिपान भैय्यांना भेटण्याची उत्सुकता आहे. खूप दिवसांनी बहीण आहे. भावा-बहिणीत गुजगोष्टी होणार आहे, कुटुंबातले वाद आहेत. बोलत राहू, अशी बोचरं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलंय.

अब्दुल सत्तार हे सिल्लोड येथील तर संदीपान भूमरे हे पैठण येथील आमदार आहेत. औरंगाबादमधील शिंदे गटातील ते महत्त्वाचे नेते आहेत. कृषीमंत्रीपद मिळाल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी केलेली काही वक्तव्ये वादाचा विषय ठरली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळेंबद्दलच्या त्यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली होती. सुषमा अंधारे यांनीही सत्तार तसेच जळगावातील गुलाबराव पाटील यांच्याविरोधात तीव्र टीका केली होती. आता औरंगाबादमध्ये सत्तार विरुद्ध सुषमा अंधारे हा सामना कसा रंगणार आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पाहा सुषमा अंधारे यांचं वक्तव्य-

सत्तार आणि भूमरे तुमचं स्वागत करतील की नाही, असा सवाल विचारल्यावर अंधारे म्हणाल्या, हो हे दोघेही माझं स्वागत करतील. मात्र त्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागेल. 2023 मध्ये मध्यावधी निवडणुका लागणार आहेत, हे मी आधीच सांगितलंय. तोपर्यंत बऱ्याच गोष्टी घडतील…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावरून सध्या महाराष्ट्र पेटून उठलाय. त्यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. हा सर्वस्वी मनसे आणि काँग्रेसचा प्रश्न आहे. आमचं मत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेऊन मांडलंय, त्यामुळे मी या वादात बोलणार नाही, असं अंधारे यांनी स्पष्ट केलंय.