BREAKING | ‘उद्धव ठाकरे यांचा मेसेज गेल्यानंतर पोलीस आयुक्त गायब झाले’, सुषमा अंधारे यांचा सर्वात मोठा दावा

"काही माध्यमांनी काल असं म्हटलं की, सदर महिला ही गरोदर नाही. ती महिला गरोदर नसेल तरी पोलीस, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी आम्हाला सांगावं की, एखादी मायमाऊली गरोदर नाही म्हणून तिच्या पोटात लाथा मारण्याचं परमीट तुम्हाला मिळतं का?", असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

BREAKING | उद्धव ठाकरे यांचा मेसेज गेल्यानंतर पोलीस आयुक्त गायब झाले, सुषमा अंधारे यांचा सर्वात मोठा दावा
Chetan Patil | Updated on: Apr 05, 2023 | 6:10 PM

ठाणे : ठाकरे गटाच्या नेत्या रोशनी शिंदे (Roshni Shinde) मारहाण प्रकरणावरुन महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) ठाण्यात आज भव्य जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला. ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर या मोर्चाची सांगता झाली. यावेळी सभेचं आयोजन करण्यात आलेलं. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सर्वात आधी भाषणाला सुरुवात केली. यावेळी सुषमा अंधारे यांनी काल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे ठाण्यात आल्यानंतर त्यांची आणि पोलीस आयुक्तांची भेट का येऊ शकली नाही? याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पोलीस आयुक्तांनी मुद्दामून ती भेट टाळली, असं सुषमा अंधारे यांचा दावा आहे.

“माझा विवेक जागृत ठेवून अत्यंत शांतपणे मला काही प्रश्न मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना विचारायचं आहे. रोशनी शिंदे एका सोशल मीडियाच्या पोस्टवर काहीतरी कमेंट करते. कमेंटला पुन्हा खाली रिप्लाय येतो. प्रकरण चिघळत जातं. बायका तिच्यापर्यंत पोहोचतात. तिला धमकवतात. ती माफी मागते. त्यानंतर तिला माफीचा व्हिडीओ तयार करायला सांगितला जातो. त्यानंतरसुद्धा तिच्या पोटात लाथा मारल्या जातात. काही माध्यमांनी काल असं म्हटलं की, सदर महिला ही गरोदर नाही. ती महिला गरोदर नसेल तरी पोलीस, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी आम्हाला सांगावं की, एखादी मायमाऊली गरोदर नाही म्हणून तिच्या पोटात लाथा मारण्याचं परमीट तुम्हाला मिळतं का? तुम्ही उत्तर द्या”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

“हे सगळं झाल्यावर काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्या माऊलीची भेट घ्यायला गेले. त्या वेळेला तिथली एकूण दुरावस्था त्यांनी बघितली. त्यानंतर ते ठाणे पोलीस आयुक्तांना भेटायला गेले. घटना काय घडलीय ते निश्चित समजून घ्या. ते सीपींना भेटायला गेले म्हणजे अचानक दारातून घुसले का? नाही. ते हॉस्पिटलमध्ये असताना तिथून सीपींना निरोप कळवला गेला की, उद्धव ठाकरे आपल्याला भेटायला येणार आहेत. सीपींनी त्यांची भेट घेणं अपेक्षित होतं. ते भेट घेऊ शकले असते. पण ते तिथून गायब झाले. आता आम्ही दाद कुणाची घ्यायची ते सांगा”, असा सवाल अंधारे यांनी केला.

“पीआय एकूण घेत नाही. सीपी गायब होतो. गृहमंत्र्यांना ऐकूच येत नाही आणि उपमुख्यमंत्र्यांना सुरत, गुवाहाटी करण्यातून वेळ मिळत नाही तर आपण सांगा आम्ही कुणाकडे दाद मागायची. अशा सगळ्यातून उद्विग्नतेतून उद्धव ठाकरेंनी फजतूस शब्द वापरला तेव्हा भक्तगण प्रचंड चवताळले. पण भाजपच्या प्रवक्त्यांकडून, माजी राज्यपालांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली तेव्हा ही भक्तगण चवताळली का नाहीत?”, असा सवाल त्यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us