तीन महिन्यांत तीन ठाकरेंची राजकारणात ग्रँड एन्ट्री

| Updated on: Jan 23, 2020 | 1:09 PM

ऑक्टोबर महिन्यात आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली, नोव्हेंबर महिन्यात उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, आणि आता जानेवारी महिन्यात अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी वर्णी लागली

तीन महिन्यांत तीन ठाकरेंची राजकारणात ग्रँड एन्ट्री
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याकडे पक्षाने नवी जबाबदारी सोपवली आहे. मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरे यांची पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. अमित ठाकरे यांनी सक्रिय राजकारणात ग्रँड एन्ट्री घेतलेली आहे. त्यासोबतच, अमित हे गेल्या तीन महिन्यांत राजकारणात पाऊल ठेवणारे तिसरे ठाकरे (Three Thackeray Family Members in Politics) ठरले आहेत.

आधी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत त्यांनी विधानसभेत पाऊल ठेवलं. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना झाल्यावर उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आली आणि उद्धव ठाकरे यांचाही संसदीय राजकारणात प्रवेश झाला. वडील मुख्यमंत्री आणि मुलगा कॅबिनेट मंत्री अशी महाराष्ट्राच्या राजकारणातील पहिली जोडगोळी पाहायला मिळाली. आता मनसेच्या नेतेपदी अमित ठाकरे यांची निवड झाली आहे.

ऑक्टोबर महिन्यात आदित्य ठाकरे यांनी लढवलेली विधानसभा निवडणूक, नोव्हेंबर महिन्यात उद्धव ठाकरे यांनी घेतलेली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ आणि आता जानेवारी महिन्यात अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी लागलेली वर्णी. तीन महिन्यांच्या कालावधीत ठाकरे पितापुत्र आणि पुतण्या यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात दमदार पदार्पण केल्याचं पाहायला मिळत आहे.

‘त्या’वेळी राज ठाकरे म्हणाले होते…

निवडणूक लढवावी की नाही, हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. उद्या माझ्या मुलाला निवडणुकीत उतरायचं असेल, आणि तो याबाबत ठाम असेल, तर मी नाही म्हणणार नाही. पण त्याला स्वतःविषयी खात्री वाटत नसेल, तर कोण काय करु शकेल? असं राज ठाकरे ऑक्टोबर महिन्यात एका मुलाखतीत म्हणाले होते.

27 वर्षांतील पहिल्याच भाषणात अमित ठाकरे म्हणाले ‘पायाखालची जमीन सरकली’

जर आमच्या मुलांना निवडणूक लढवावी असं वाटत असेल, तर आम्ही त्यांना मागे खेचणार नाही. त्यामुळे आदित्यला निवडणूक लढवायची असेल, तर त्यात चूक काय? असं राज ठाकरे म्हणाले होते. आता अमित ठाकरेही संसदीय राजकारणात उतरणार का, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, तिथे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने उमेदवार दिला असला, तरी मनसेने विरोधात उमेदवार उभा केला नव्हता. ‘हे एक चांगलं कृत्य (जेश्चर) आहे. तो निवडणूक लढवत असेल, तर त्याच्याविरोधात उमेदवार देता कामा नये, असं मला वाटतं, त्यांना काय वाटतं, हा वेगळा मुद्दा आहे, असंही राज ठाकरे म्हणाले होते.

Three Thackeray Family Members in Politics