उदय सामंत यांचा आधी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला, नंतर सारवा सारव; नेमकी टीका काय?

आम्ही औरंगाबादेत नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. विकास करताना राजकारण करण्याची गरज नाही. खासदार जलील यांनी इंडस्ट्री थांबण्यासाठी खरोखरच प्रयत्न केले तर‌ त्यांचं कौतुकच आहे.

उदय सामंत यांचा आधी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला, नंतर सारवा सारव; नेमकी टीका काय?
उदय सामंत
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Oct 21, 2022 | 10:14 AM

औरंगाबाद: शिंदे गटाकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. आता राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत (uday samant) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मात्र, नंतर पुन्हा सारवासारवही केली. बाळासाहेब ठाकरे यांना पाकिस्तान (pakistan) घाबरायचा आता आपल्याला शेजारच्या गल्लीत कुणी घाबर नाही, असं उदय सामंत उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हणाले. पण त्यानंतर सामंत यांनी लगेच सारवासारव करत मी उद्धव साहेबांबद्दल बोलत नाही, असा खुलासा त्यांनी केला. ते मीडियाशी संवाद साधत होते.

जिहाद फक्त कुराणातच नाही तर गीतेतही आहे, असं विधान काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी केल होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवराज पाटील चाकूरकर असे का बोलले याचा खुलासा त्यांनीच करावा. त्यांनी केंद्रात आणि महाराष्ट्रात मोठं राजकारण केलं आहे. शिवराज पाटील यांच्या विधानाशी काँग्रेस सहमत आहे का? ही काँग्रेसची भूमिका आहे का? याचा खुलासा काँग्रेसने केला पाहिजे, अशी मागणी उदय सामंत यांनी केली.

आम्ही औरंगाबादेत नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. विकास करताना राजकारण करण्याची गरज नाही. खासदार जलील यांनी इंडस्ट्री थांबण्यासाठी खरोखरच प्रयत्न केले तर‌ त्यांचं कौतुकच आहे. आम्ही मनाचे मोठे लोक आहोत, असं उदय सामंत म्हणाले.

विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे हे माझे चांगले मित्र आहेत. सरकारच्या विरोधात बोलले नाही तर त्यांच पद राहणार नाही. त्यांनी टीका करणे अपेक्षित आहे, टीका त्यांनी केली पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

भविष्यात मतदान हे बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपलाच होईल. भविष्यात सर्व निवडणुका बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप आम्ही एकत्र लढवणार आहोत. एकनाथ शिंदे यांच्या सभेला होणारी गर्दी मला बाळासाहेबांच्या सभेला होणारी गर्दी वाटते, असं ते म्हणाले. तसेच वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प आम्ही वर्षभरात आणणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.