उदय सामंत यांच्यावरील हल्ल्याला शिंदे गट प्रत्युत्तर देणार! हल्ला झाला त्याच कात्रज चौकात सामंतांची सभा होणार

हल्ला पूर्वनियोजित आणि सुपारी देऊन करण्यात आल्याचा आरोप सामंत यांनी केला आहे. शिंदे गटाकडून आता सामंतांवर झालेल्या हल्लाला प्रत्युत्तर दिलं जाणार आहे.

उदय सामंत यांच्यावरील हल्ल्याला शिंदे गट प्रत्युत्तर देणार! हल्ला झाला त्याच कात्रज चौकात सामंतांची सभा होणार
उदय सामंत, माजी मंत्री
Image Credit source: Google
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Aug 07, 2022 | 8:41 AM

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार आणि माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर पुण्यातील कात्रजमध्ये हल्ला झाला होता. एकमुथ शिंदे यांच्यासह सामंत पुणे दौऱ्यावर होते. त्याचवेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचीही पुण्यात सभा होती. उदय सामंत यांची गाडी कात्रज चौकात आली असता काही शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला चढवला होता. या हल्ल्यात त्यांच्या गाडीची मागची काच फुटली. याबाबत सामंत यांनी कोथरूड पोलीस (Kothrud Police) ठाण्यात गुन्हा दाखल केला, पोलिसांनीही कारवाई करत आरोपींना अटक केली. मात्र, हा हल्ला पूर्वनियोजित आणि सुपारी देऊन करण्यात आल्याचा आरोप सामंत यांनी केला आहे. शिंदे गटाकडून आता सामंतांवर झालेल्या हल्लाला प्रत्युत्तर दिलं जाणार आहे. ज्या कात्रज चौकात सामंत यांच्यावर हल्ला झाला, तिथेच सामंत यांची जाहीर सभा घेतली जाणार आहे.

सुपारी देऊन हल्ला झाल्याचा सामंतांचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार सामंत यांच्यावर ज्या कात्रज चौकात हल्ला झाला. त्याच ठिकाणी आता सामंतांची जाहीर सभा घेतली जाणार आहे. जाहीर सभेच्या माध्यमातून सामंत या हल्ल्याला प्रत्युत्तर देणार आहेत. शिंदे गटाचे पुणे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी तशी माहिती दिलीय. 2 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास सामंत यांची गाडी कात्रज चौकातून जात होती. सिग्नल लागल्यामुळे त्यांची गाडी थांबली असता काही शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला चढवला. यावेळी सामंत यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सामंत यांच्या सुरक्षारक्षकांनी शिवसैनिकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली. त्यानंतर सामंत यांनी सुपारी देऊन हल्ला झाल्याचा आरोप करत, कोथरुड पोलिसांकडे गुन्हा दाखल केला.

उदय सामंत यांचा इशारा

हल्ला झाल्यानंतर माध्यमांशी सामंत यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी हल्लेखोरांना इशारा दिला. असा भ्याड हल्ला करुन कुणाला वाटत असेल की मी शिंदे साहेबांची साथ सोडेन, आमचे 45 लोक शिंदे साहेबांची साथ सोडतील, तर आज या हल्ल्यानं आम्ही होतो त्यापेक्षा जवळ आलो आहोत. असे भ्याड हल्ले करुन उदय सामंत थांबणारा नाही. कुठल्याही प्रसंगाला समोरा जाणारा आहे. कुणावर टीका करत नाही, त्याचा अर्थ मी हतबल नाही. आमच्या सहनशिलतेचा अंत कुणी पाहू नये, असा इशाराच सामंत यांनी हल्लेखोरांना दिलाय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us