Uddhav Thackeray : ‘प्रसाद ओकने आनंद दिघे पुन्हा जिवंत केले’, उद्धव ठाकरेंकडून कौतुक, फडणवीसांवर मात्र बोलणं टाळलं

| Updated on: May 15, 2022 | 10:44 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि प्रसाद ओकसोबत नरीमन पॉईंट इथल्या आयनॉक्स चित्रपटगृहात हा चित्रपट पाहिला. त्यानंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी अभिनेता प्रसाद ओकच्या भूमिकेचं तोंडभरून कौतुक केलं.

Uddhav Thackeray : प्रसाद ओकने आनंद दिघे पुन्हा जिवंत केले, उद्धव ठाकरेंकडून कौतुक, फडणवीसांवर मात्र बोलणं टाळलं
अभिनेता प्रसाद ओकचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून कौतुक
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीत सध्या धर्मवीर चित्रपट चांगलाच गाजतो आहे. शिवसेनेचे नेते, बाळासाहेबांचे कट्टर समर्थक मानले जाणारे आण ज्यांना धर्मवीर म्हणून ओळखलं जातं अशा आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट मंगेश देसाई आणि प्रवीण तरडे यांनी बनवलाय. त्यात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि प्रसाद ओकसोबत नरीमन पॉईंट इथल्या आयनॉक्स चित्रपटगृहात हा चित्रपट पाहिला. त्यानंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी अभिनेता प्रसाद ओकच्या (Prasad Oak) भूमिकेचं तोंडभरून कौतुक केलं. मात्र, काही वेळापूर्वीच आपल्यावर सडकून टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलणं मात्र उद्धव ठाकरे यांनी टाळलं.

धर्मवीर चित्रपट पाहिल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, दुसऱ्यांच्या जीवनात आनंद भरणारे आमचे आनंद दिघे प्रसाद ओकेने पुन्हा जिवंत केले. अप्रतिम भूमिका केली आहे. आनंदजींच्या ज्या लकबी होत्या त्या त्याने उत्तमरित्या साकारल्या आहेत. तुम्हाला मनापासून शुभेच्छा. सर्वांनी हा चित्रपट पाहावा. आयुष्य कसं जगावं हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पाहा. शिवसैनिक कसा असावा, निष्ठा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे काय? हे या चित्रपटातून कळतं. शिवसेनाप्रमुख आणि आनंद दिघेंचं नातं काय हे या चित्रपटातून पाहायला मिळतं. असे शिवसैनिक मला लाभले, एकनाथ शिंदे, राजन आहे, हे सगळे आनंद दिघे यांच्या मुशीतून तयार झाले आहेत. गुरु शिष्याचं नातं कसं असावं हे चित्रपटातून दिसतं.

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब आणि आनंद दिघेंची आठवण सांगितली

चित्रपटातील एका प्रसंगात बाळासाहेब रागावलेले दाखवलं आहे. ते खरं आहे, कारण दिलेल्या वेळेत आनंद दिघे कधी यायचे नाहीत. मग बाळासाहेब चिडायचे, विचारायचे काय? दिघे म्हणायचे ठाण्यात निवडणूक आहे ही उमेदवारांची यादी. बाळासाहेब फक्त एकच प्रश्न विचारायचे भगवा फडकावशील? दिघे म्हणायचे हो… बाळासाहेब ती यादीही पाहायचे नाहीत आणि म्हणायचे कर तुला काय करायचं ते, ती यादीही ते पाहायचे नाहीत, अशी एक आठवण मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली.

हे सुद्धा वाचा

फडणवीसांवर बोलणं टाळलं!

यावेळी पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर प्रश्न विचारला. त्यावेळी कुठलंही उत्तर न देता उद्धव ठाकरे यांनी बोलणं टाळलं आणि ते तिथून निघून गेले. त्यामुळे उद्धव ठाकरे आज जरी फडणवीसांच्या टीकेवर काही बोलले नसले तरी औरंगाबादेत त्यांची सभा होणार आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे फडणवीसांना काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.