Uddhav Thackeray : एसटी कर्मचाऱ्यांसाठी जे शक्य ते सर्व करणार, ‘शिवाई’च्या लोकार्पणावेळी उद्धव ठाकरे यांची ग्वाही; एसटी कर्मचाऱ्यांचे मानले आभार

| Updated on: Jun 01, 2022 | 1:27 PM

सर्व करता येतं पण पैशांचे सोंग आणता येत नाही. मात्र, एस.टी कर्मचाऱ्यांसाठी जे जे करणं शक्य आहे ते केलं आणि यापुढेही करणारच.  त्यात कुठेही मागेपुढे पहाणार नाही, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

Uddhav Thackeray : एसटी कर्मचाऱ्यांसाठी जे शक्य ते सर्व करणार, शिवाईच्या लोकार्पणावेळी उद्धव ठाकरे यांची ग्वाही; एसटी कर्मचाऱ्यांचे मानले आभार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एसटी कर्मचाऱ्यांना ग्वाही
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा अमृत महोत्सवी पदार्पण सोगळा आणि एसटीच्या पहिल्या इलेक्ट्रिक बसचं (Electric Bus) लोकार्पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन उपस्थित नोंदवली तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), परिवहन मंत्री अनिल परब, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, एसटी महामंडळाचे आयुक्त शेखर चन्ने यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे (ST Employees) आभार मानले. तसंच एसटी कर्मचाऱ्यांसाठी जे जे शक्य असेल ते सर्व करु, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलीय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की,  एखादी सेवा जी आपण रोज बघतो, तिचा वापर करतो, तेंव्हा ती किती वर्षाची झाली याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. आपल्या एस.टीची 75 वर्षे अशीच आहेत. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत.  आपल्या एस.टी ची सुरुवात ही 1948 साली झाली. पहिली एस.टी कशी होती, तिचं रंगरूप आकार कसा होता हे आज आपण चित्रफितीच्या माध्यमातून  पाहिलं. आपली एस.टी काळानुरुप किती बदलली हे यातून दिसलं. एस.टीची ही वाटचाल पुण्यात सुरु झाली आणि एस.टीचा आजचा अमृतमहोत्सवी कार्यक्रमही पूण्यात होत आहे, हा एक योगायोग असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘संस्कृती जपतांना राज्य आणि देशाचे भवितव्य तुम्ही जपत आहात’

एस.टीची ही अमृतमहोत्सवी वाटचाल सर्व माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावी, आजची चित्रफित सर्व वाहिन्यांवरून दाखवण्यात यावी. म्हणजे काळाप्रमाणे एस.टी कशी बदलली हे यातून दिसेल. प्रवासी वाहतूक सेवा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी हवी. एस.टीने हे काम गेली 75 वर्षे केले. एस.टीला शुभेच्छा आहेतच. माझ्या शुभेच्छांबरोबरच एस.टीला आज लहान मुलींनीही शुभेच्छा दिलेल्या पाहिल्या. म्हणजेच एस.टीचं जे भविष्य आहे तेही त्यांच्या लाडक्या एस.टीला शुभेच्छा देतांना दिसत आहे. संस्कृती जपतांना राज्य आणि देशाचे भवितव्य तुम्ही जपत आहात, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी एसटी महामंडळाचं कौतुक केलं.

‘सर्व करता येतं पण पैशांचे सोंग आणता येत नाही’

कोरोना काळात एस.टीच्या बहाद्दर कर्मचाऱ्यांनी पराक्रम केला. त्या ऋणातून कधीच उतराई होता येणार नाही. गाव तिथे एस.टी असं ब्रीद असतांना कोरोना काळात एस.टीने शहरातही सेवा दिली. महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षणात, गावात एस.टीचे योगदान आहे. एस.टीमुळे माझ्या आयुष्यात किती लाभ झाला असं सांगणारी कितीतरी दिग्गज मंडळी आपल्याकडे आहेत. परिवारातील सदस्य म्हणून आम्ही एस.टी कर्मचाऱ्यांकडे पहात आहोत. म्हणूनच एस.टी अडचणीत असतांना शासनाने मदत केली. सर्वसामान्यांना परवडणारी परिवहन सेवा देण्याच काम एस.टी करत असल्याने एस.टीचा तोटा वाढला. मागील काही महिने, एस.टी कर्मचाऱ्यांचं वेतन शासनाकडून दिलं आणि पुढच्या काही वर्षाची हमी शासनाने घेतली आहे. सर्व करता येतं पण पैशांचे सोंग आणता येत नाही. मात्र, एस.टी कर्मचाऱ्यांसाठी जे जे करणं शक्य आहे ते केलं आणि यापुढेही करणारच.  त्यात कुठेही मागेपुढे पहाणार नाही, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

‘एकजुटीने जनसेवेचा वसा पुढे चालू ठेऊ या’

राज्यातील रस्ते आता चांगले होत आहेत. पर्यावरणपूरक वाहनं सर्वात जास्त असणारी मुंबई हे पहिलं शहर ठरणार आहे. एस.टीत सुद्धा हा प्रयोग आपण करत आहोत. एस.टी सेवा प्रदुषणविरहित कशी होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे, तसा आपला प्रयत्न असणार आहे. एस.टी सुधारणांसाठी नवीन संकल्पना आणतो आहोत. काळ बदलतो तसं तंत्रज्ञान बदलतं, गरजा बदलत आहेत. या बदलाप्रमाणे प्रगती करणं आपल्या सर्वांचे उद्दिष्ट आहे. एस.टी कर्मचारी- तुम्ही -आम्ही, राज्यातील जनता सर्व एका कुटुंबातील सदस्य आहोत. कुटुंबातील सर्वांना सुखात आणि आनंदात ठेवणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आपण एक आहोत, आपण एकजुटीने जनसेवेचा वसा पुढे चालू ठेऊ या. महाराष्ट्राच्या प्रगतीच्या वाटचालीतील तुम्ही एक अविभाज्य घटक आहात, तुम्ही राज्याचं वैभव आहात ते जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.