मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार मोठ्या संकटात सापडलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवेसनेचे 41 तर अपक्षांसह 47 आमदार सध्या गुवाहाटीतील हॉटेल रेडिसन्स ब्ल्यू मध्ये मुक्कामी आहेत. अशावेळी शिवसेनेकडून या बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांच्या प्रस्तावानुसार आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्यासाठी तयार आहोत. मात्र, 24 तासांच्या आत आमदारांनी मुंबईत यावं, असं आवाहन केलं आहे. मात्र, संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाराज असल्याचं दिसत आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केलीय. मात्र, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतरच राष्ट्रवादी पुढील भूमिका स्पष्ट करेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. या बैठकीत संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्यास तयार असल्याच्या वक्तव्यावर चर्चा झाली. या बैठकीत अनेक नेत्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप अशाप्रकारची भूमिका मांडली नाही. किंवा त्यांच्याकडून तसा कुठलाही निरोप आलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील किंवा उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करेल, असं राष्ट्रवादीच्या बैठकीत ठरल्याची माहिती आहे.
यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना मार्गदर्शन केलं. असे प्रसंग येतात, जातात. आपण आजही शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहोत. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला तर त्यानंतर आपली पुढील भूमिका ठरवू, असं पवार यावेळी म्हणाल्याचं सांगितलं जात आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, मला असं वाटतं त्यांनी असं विधान करण्यापूर्वी महाविकास आघाडीतील आमच्या पक्षाचे जे नेते आहेत, त्यांच्याशी आधी चर्चा करायला हवी होती. त्यांनी विश्वासात घेऊन बोलायला हवं, त्यांच्या काय अडचणी आहेत ते सांगायला हवं होतं. अर्थात शिवसेना स्वतंत्र पक्ष आहे. त्यांच्या निर्णय घेण्यास ते स्वतंत्र आहेत. मी ही चॅनलवर ऐकली की ते म्हणाले तुम्ही या, आम्ही सरकारमधून बाहेर पडतो. आता कुठल्याही पक्षाला सरकारमध्ये राहायची की नाही हे ते ठरवू शकतात. पण त्यांनी सांगणं अपेक्षित आहे. उद्या सरकार अडचणीत आलं आणि पडलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजिबात काळजी करत नाही. विरोधी पक्षात बसून जनतेची सेवा करण्याची सवय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्याप्रकारे आहे. त्यामुळे आमच्यासाठी ते नवीन नाही. सत्ता येते, सत्ता जाते आमची विरोधी पक्षात बसण्याचीही तयारी आहे. पण एकदा त्यांनी आमचे नेते शरद पवार, अजितदादा, जयंत पाटील यांना सांगावं आणि एकदाचा यातील संभ्रम दूर करावा.