केंद्रातील मोदी सरकारची थेट मोगलांशी तुलना, नेत्यानाहू होण्याचाही इशारा; काय म्हटलंय दैनिक ‘सामना’त?

ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. आता त्यांना घर खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावरून ही टीका करण्यात आली आहे.

केंद्रातील मोदी सरकारची थेट मोगलांशी तुलना, नेत्यानाहू होण्याचाही इशारा; काय म्हटलंय दैनिक सामनात?
narendra modi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 29, 2023 | 8:21 AM

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली. त्यानंतर त्यांना सरकारी बंगला खाली करण्याची नोटीसही देण्यात आली. त्यामुळे काँग्रेसमध्ये संतापाचं वातावरण आहे. दैनिक ‘सामना’तूनही केंद्र सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली आहे. भारत म्हणजे पाकिस्तान नाही. पाकिस्तानप्रमाणे भारतातही विरोधकांना बेगुमानपणे चिरडता येणार नाही, असं ठणकावतानाच इस्रायलप्रमाणे भारतीय लोकही एक दिवस लोकशाहीच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरतील. इस्रायलमध्ये पंतप्रधान नेत्यानाहू यांना पळून जावे लागले. नेत्यानाहू हे मोदींचे मित्र आहेत. इस्रायलमध्ये जे घडले त्यापासून तरी दिल्लीतील ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी धडा घ्यावा. नाहीतर तुमचाही नेत्यानाहू होईल. देश त्याच दिशेने निघाला आहे, असं दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून ठणकावण्यात आलं आहे.

दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून पाकिस्तान आणि इस्रायलच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करतानाच मोदी सरकारला इशारा दिला आहे. पाकिस्तानमध्येही विरोधकांना चिरडलं जात आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेची तयारी सुरू आहे. त्यांच्याही घरावर बुलडोझर फिरवला जात आहे. पाकिस्तानात पूर्वीपासूनच सुडाचे राजकारण सुरू आहे. राजकीय विरोधक हा जन्मजन्मांतरीचा शत्रू असल्याचे मानून त्यास खतम केले जाते, पण भारतातही पाकिस्तानचाच मार्ग स्वीकारणार असेल तर कसे व्हायचे?, असा सवाल दैनिक सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

कर्माची फळे भोगावी लागतील

राहुल गांधी यांना एका प्रकरणात शिक्षा झाली. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. खासदारकी रद्द व्हावी म्हणून त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यानंतर लगेच त्यांना घर खाली करण्याची नोटीसही देण्यात आली. एखाद्यात अतिआत्मविश्वास असू शकतो, पण हा इतका अतिनिर्घृणपणा एखाद्याच्या अंगात संचारतो कसा? असा सवाल करतानाच राहुल गांधी यांची खासदारकी तर घालवून दाखविलीच, पण आता त्यांच्या डोक्यावरचे छप्परही काढून घेतले. हा आसुरी आनंद ज्यांना आज झाला आहे, त्यांना भविष्यात कर्माची फळे भोगावी लागतील हे नक्कीच, असा इशाराही अग्रलेखातून देण्यात आला आहे.

मोगलांनीही असं राज्य केलं नसेल

इतक्या खुनशीपणाने कदाचित मोगलांनीही राज्य केले नसेल. आज संपूर्ण दिल्लीतील अनेक सरकारी बंगल्यांवर भाजप व संघ परिवाराचा अवैध कब्जा आहे. निवृत्त होऊन, पराभूत होऊन कधीच ‘माजी’ झालेल्या भाजप खासदारांनी त्यांचे बंगले सोडले नाहीत. संघ परिवाराच्या संस्था आणि नेत्यांनी त्यांच्या राजकीय कार्यासाठी सरकारी बंगले मिळवले आहेत, पण राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करताच 24 तासांत त्यांना राहते घर सोडण्याचे आदेश दिले गेले, याकडेही अग्रलेखातून लक्ष वेधण्यात आले आहे.

अग्रलेखात काय?

नेहरू-गांधी कुटुंबातील तरुण नेत्यास मोदी सरकारने इतक्या निर्घृण-खुनशी पद्धतीने बेघर करावे हे हिंदुत्वाच्या संस्कार आणि संस्कृतीस शोभणारे नाही. गौतम अदानी यांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या मदतीने देश लुटला हे आता उघड झाले आहे. त्यांच्या कोणत्याही संपत्तीवर जप्ती आली नाही. राहुल गांधी यांनी ज्या सर्व ‘मोदीं’चा नामोल्लेख करून त्यांच्या चौर्यकथांचा पर्दाफाश केला, त्यांचीही घरे-बंगले शाबूत आहेत, पण चोरांना चोर म्हटल्याबद्दल राहुल गांधी यांची खासदारकी आणि घरही आता काढून घेण्यात आले. देशाची लोकशाही किती कठीण कालखंडातून जात आहे त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.

अदानी यांनी एलआयसी, स्टेट बँकेचे पैसे उडवलेच, पण कष्टकऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड म्हणजे कर्मचारी भविष्य निधीचे पैसेही मोदी सरकारने अदानी यांच्या खात्यात वळवून हाहाकार माजवला आहे. हा जनतेचा पैसा आहे. या लुटीच्या चौकशीची मागणी करणाऱ्यांचा छळ केला जात आहे. संयुक्त संसदीय समिती स्थापून या सर्व घोटाळ्यांची चौकशी करा, ही विरोधकांची मागणी आहे. मोदींचे सरकार चौकशीला घाबरून पळ काढत आहे. मुंबई महानगरपालिकेतील कारभाराची चौकशी करू असे सांगितले गेले, पण अदानी-मोदी संबंधांची चौकशी कधी करणार ते सांगा?

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us