मुख्यमंत्री दालनाला वंदन करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला

| Updated on: Nov 29, 2019 | 4:34 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (29 नोव्हेंबर) मंत्रालयात येऊन मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला (Uddhav Thackeray take charge as CM).

मुख्यमंत्री दालनाला वंदन करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (29 नोव्हेंबर) मंत्रालयात येऊन मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला (Uddhav Thackeray take charge as CM). याआधी उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौकात अभिवादन केलं. मंत्रालयात येताच मुख्यमंत्र्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मंत्रालयात पदभार स्वीकारताना उद्धव ठाकरे यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, निलम गोऱ्हे आणि दिवाकर रावते इत्यादी शिवसेना नेते देखील हजर होते.

यापुढील काळ उद्धव ठाकरेंसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील अनेक प्रश्नांवर उत्तरं शोधायची आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, आर्थिक मंदी इत्यादी प्रश्न आ वासून उभे आहेत. त्यामुळे नव्या सरकारकडून अनेक अपेक्षा आहेत. यावर ठोस उपाययोजना करणे उद्धव ठाकरेंसमोर मोठं आव्हान असणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या स्वागताला शिवसेनेचे सर्व बडे नेते उपस्थित होते. याशिवाय उद्धव ठाकरेंसोबत शपथ घेतलेले मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ आणि नितीन राऊत हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. या स्वागतानंतर उद्धव ठाकरे अँटीचेंबरमध्ये गेले. तेथे त्यांनी मंत्र्यांसोबत थोडावेळ चर्चा केली. त्यांनी मंत्रालयातील सचिवांचीही बैठक घेत अधिकाऱ्यांची ओळख करुन घेतली. तसेच त्यांच्याकडे कोणत्या जबाबदाऱ्या आहेत याची माहिती घेतली. विभागनिहाय खात्यांचे प्रश्न काय आहेत हेही समजून घेण्याचा प्रयत्न केला. यातून त्यांनी आपल्या प्रशासकीय कारभारातील पहिलं पाऊल टाकलं आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटची बैठकही बोलावली.

दरम्यान, मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं औक्षण केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांना ओवाळताना महिलांनी ईडा-पिडा टळो, बळीचं राज्य येवो, असं म्हटलं. त्यावर नव्या मुख्यमंत्र्यांनी बळीराजाचं राज्यच येणार असं म्हणत ओवळणीच्या ताटात ओवाळणी दिली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री कक्षात प्रवेश करण्याच्याआधी वंदन केलं आणि मगच आत प्रवेश केला.

याआधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह नव्याने शपथविधी झालेल्या मंत्र्यांनी मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी खासदार विनायक राऊत, अनिल देसाई, माजी मंत्री दिवाकर रावते, डॉ. दीपक सावंत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार आदित्य ठाकरे आणि त्यांचे मावस बंधू वरुण सरदेसाई, आमदार अब्दुल सत्तार, संजय शिरसाठ, शशिकांत खेडेकर, संजय राठोड, विजय शिवतारे, माजी आमदार जयप्रकाश मुंदडा, सुभाष साबणे, प्रकाश शेंडगे, सरदार तारासिंग यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.