उद्धव बाळासाहेब ठाकरे, मंत्रालयात पाटी लागली, पदभार स्वीकारण्याचा मुहूर्तही ठरला

| Updated on: Nov 29, 2019 | 8:36 AM

'उद्धव बाळासाहेब ठाकरे' अशी पाटी मंत्रालयातील केबिनबाहेर लागली असून ते दुपारी एक वाजता मंत्रालयात पदभार घेतील

उद्धव बाळासाहेब ठाकरे, मंत्रालयात पाटी लागली, पदभार स्वीकारण्याचा मुहूर्तही ठरला
Follow us on

मुंबई : शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना स्मरुन, हजारोंच्या जनसमुदायाच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेण्यासाठी ठाकरे सरकार सज्ज आहेत. ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ अशी त्यांच्या नावाची पाटी मंत्रालयातील केबिनबाहेर लागली असून ते पदभार स्वीकारण्यासाठी दुपारी एक वाजता मंत्रालयात (Uddhav Thackeray to take charge as CM) दाखल होणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी मंत्रालयाच्या दरवाजाबाहेर फुलांची आरास करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथविधीनंतर काल रात्री (गुरुवार 28 नोव्हेंबर) तात्काळ कॅबिनेटची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी अनेक विषयांवर चर्चा करत काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन निर्णयांची माहिती दिली.

“अवकाळी पाऊस, दुष्काळाने हौदोस घातला आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत केवळ फसव्या घोषणा झाल्या. मला घोषणांचा बाजार भरवायचा नाही. शेतकऱ्यांची आतापर्यंत फसवणूक झाली आहे. त्यांना कर्जमाफीची घोषणा झाल्यावर प्रमाणपत्र दिले, पण खात्यावर पैसे जमा केले नाही. मला शेतकऱ्यांना तुटपूंजी मदत करायची नाही. आम्हाला शेतकऱ्यांना आनंद वाटेल असं काम करायचं आहे. त्यामुळे आम्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनांचा अभ्यास करुन त्यात किती मदत बाकी आहे हे तपासू. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी मोठी मदत करु. येत्या 2 दिवसात शेतकऱ्यांसाठी मोठ्या मदतीची घोषणा करु.” असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं होतं.

रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी 20 कोटी

उद्धव ठाकरे यांनी आपल्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत किल्ला संवर्धनाबाबत ठोस निर्णय घेतला. त्यांनी रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केली. रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी 606 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार आहे. या आराखड्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय प्रलंबित होता. हे लक्षात घेऊन उद्धव ठाकरेंनी रायगड किल्ल्याच्या विकास कामांची नस्ती मागवली. तसेच विशेष बाब म्हणून निधी वितरणाच्या प्रस्तावास मान्यता देवून त्यासंदर्भातील नस्तीवर पहिली स्वाक्षरी केली.

महाविकासआघाडीच्या नव्या सरकारबाबत 10 विशेष गोष्टी

छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले हा राज्याचा समृद्ध वारसा आहे. त्याचे जतन करणे आणि पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी संवर्धन करणे आवश्यक आहे. राज्यशासन त्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करील, असं मत मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केलं.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेलाही उत्तर दिले. “ज्यांनी टीका केली त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. त्यामुळे हे मंत्रिमंडळ कोणत्या विभागाचे आहे, हे त्यांनी अभ्यास करुन सांगावे.” असं ते म्हणाले होते. आता उद्धव ठाकरे राज्याची सूत्रं हाती (Uddhav Thackeray to take charge as CM) घेत आहेत.