लातूर शहरमध्ये वंचितमुळे काँग्रेसची दमछाक

वंचितच्या उमेदवारामुळे काँग्रेसच्या मतांचं (Latur Vanchit Bahujan Aghadi) मोठ्या प्रमाणात विभाजन झालंय, ज्याचा थेट फायदा भाजपच्या उमेदवाराला झाल्याचा अंदाज आहे.

लातूर शहरमध्ये वंचितमुळे काँग्रेसची दमछाक
| Edited By: | Updated on: Oct 22, 2019 | 10:19 PM

लातूर : गेल्या अनेक वर्षांपासून लातूर शहर हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र यावेळेला हा किल्ला ढासळतो की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. कारण, काँग्रेससमोर वंचित बहुजन आघाडीने (Latur Vanchit Bahujan Aghadi) मोठं आव्हान निर्माण केलं आहे. त्यामुळे लातूर शहरात भाजपा येईल की काँग्रेस हा अंदाज बांधणं कठीण काम झालंय. वंचितच्या उमेदवारामुळे काँग्रेसच्या मतांचं (Latur Vanchit Bahujan Aghadi) मोठ्या प्रमाणात विभाजन झालंय, ज्याचा थेट फायदा भाजपच्या उमेदवाराला झाल्याचा अंदाज आहे.

वंचित आघाडीने राजासाब मणियार हे मुस्लीम उमेदवार दिले. त्यामुळे काँग्रेसकडे परंपरागत असलेला दलित-मुस्लीम मतदार मोठ्या संख्येने वंचितकडे वळल्याची चर्चा आहे. लातूर शहरात मुस्लीम, दलित आणि लिंगायत मतांची संख्या मोठी आहे. काँग्रेसकडून अमित देशमुखांनी निवडणुकीत प्रचारात आघाडी घेतली. तरी काँग्रेसला ही लढाई सोपी आहे असं दिसत नाही. भाजपाने यावेळी जाहीर सभा-रॅली यावर भर न देता प्रत्येक मतदार गाठण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपोआपच हा मतदारसंघ तिहेरी लढतीचा बनला.

काँग्रेस-भाजपा आणि वंचित आघाडी अशी तिहेरी लढत इथे पाहायला मिळत आहे. काँग्रेसला मात्र लोक वंचितला फार सहकार्य करणार नाहीत आपणच निवडून येऊ असा विश्वास वाटतो आहे. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे थोरले चिरंजीव अमित देशमुख यांची प्रतिष्ठा या मतदारसंघात पणाला आहे, तर दुसरीकडे ग्रामीण मतदारसंघात धाकटे चिरंजीव धीरज देशमुख हे निवडणूक लढवत आहेत.