Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीतील धक्कादायक निकाल, विलासरावांसह अनेकांना बसला होता झटका! वाचा सविस्तर

| Updated on: Jun 19, 2022 | 11:47 PM

राज्याने असे अनेक धक्कादायक निकाल आजवर पाहिले आहेत. त्यात माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh), शेकापचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह अनेकांना यापूर्वी असाच धक्का पचवावा लागला होता.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीतील धक्कादायक निकाल, विलासरावांसह अनेकांना बसला होता झटका! वाचा सविस्तर
गणपतराव देशमुख, विलासराव देशमुख, अनिल परब
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Election) रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी सोमवारी मतदान होणार आहे. या 10 जागांसाठी एकूण 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपनं पूर्ण ताकद पणाला लावली आहे. 10 व्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात लढत होत आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का देत भाजपनं बाजी मारली. तसाच धक्कादायक निकाल विधान परिषद निवडणुकीतही लागणार का? अशी चर्चा सध्या राजकारण सुरु आहे. मात्र, राज्याने असे अनेक धक्कादायक निकाल आजवर पाहिले आहेत. त्यात माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh), शेकापचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह अनेकांना यापूर्वी असाच धक्का पचवावा लागला होता.

विलासरावांचा अवघ्या अर्धा मताने पराभव!

विलासराव देशमुख 1995 मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर 1996 मध्ये ते विधान परिषद निवडणुकीत ते विधान परिषदेसाठी उपक्ष म्हणून उभे राहिले. तेव्हा काँग्रेसनं त्यांना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे शिवसेनेच्या मदतीने विलासरावांनी नशीब आजमावण्याचं ठरवलं. त्यावेळी नवव्या जागेसाठी दोन अपक्ष लालसिंह राठोड आणि विलासराव देशमुख यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी विलासराव देशमुखांना पहिल्या पसंतीची 19 मतं मिळाली तर राठोड यांना 20 मतं मिळाली होती. पुढच्या पसंती क्रमानुसार राठोड यांना 2 हजार 468 तर विलासरावांना 2 हजार 409 मतं मिळाली. संपूर्ण मतमोजणी झाल्यावर विलासराव देशमुख यांचा अवघ्या 0.59 मतांनी पराभव झाला होता. विलासरावांचा तो पराभव राजकीय वर्तुळात चांगलीच गाजला होती.

अनिल परब यांचाही झाला होता पराभव

2010 च्या निवडणुकीत विद्यमान परिवहन मंत्री अनिल परब यांना पराभवाची चव चाखावी लागली होती. पहिल्या पसंतीची सर्वात कमी मतं मिळाले काँग्रेसचे विजय सावंत विजय झाले होते. त्यावेळी भाजपच्या शोभाताई फडणवीस यांना 24, अनिल परबांना 21 तर विजय सावंतांना 13 मतं मिळाली होती. तेव्हा 2 हजार 619 मतांचा कोटा होता. विजय सावंत यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाच उमेदवारांची दुसऱ्या पसंतीची मतं मिळाली आणि त्यांनी कोटा पूर्ण केला. त्यामुळे शोभाताई फडणवीस आणि अनिल परब यांना पहिल्या पसंतीची अधिक मतं मिळूनही पराभव स्वीकारावा लागला होता.

गणपतराव देशमुखही झाले होते पराभूत

शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांनाही 1995 च्या विधान परिषद निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. पुरोगामी लोकशाही आघाडीची मतं फुटल्यानं गणपतराव देशमुख पराभूत झाले होते. महत्वाची बाब म्हणजे हेच गणपतराव देशमुख सर्वाधिक 11 वेळा विधानसभेवर निवडून गेले होते.