हिंमत असेल तर राज यांनी नाणारवासियांसमोर भूमिका मांडावी; शिवसेनेचं आव्हान

| Updated on: Mar 07, 2021 | 12:56 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला पाठिंबा दिला असून त्यावरून शिवसेना नेते विनायक राऊत यांनी टीका केली आहे. (Vinayak Raut slams Raj Thackeray over Nanar project)

हिंमत असेल तर राज यांनी नाणारवासियांसमोर भूमिका मांडावी; शिवसेनेचं आव्हान
राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
Follow us on

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला पाठिंबा दिला असून त्यावरून शिवसेना नेते विनायक राऊत यांनी टीका केली आहे. नाणारमध्ये 221 भूमाफियांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यांच्यासाठी राज यांनी भूमिका बदलली आहे का?, असा सवाल करतानाच हिंमत असेल तर राज यांनी नाणारवासियांसमोर भूमिका मांडावी, असं आव्हानच विनायक राऊत यांनी दिलं आहे. (Vinayak Raut slams Raj Thackeray over Nanar project)

विनायक राऊत यांनी टिव्ही 9 मराठीशी बोलताना ही टीका केली आहे. राज ठाकरे यांनी कोकणात येऊन नाणार प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली होती. आता त्यांचं मतपरिवर्तन कशासाठी झालं हे माहित नाही. 221 गुजराती लोकांनी जमिनी खरेदी केल्या त्यांच्या भल्यासाठी ही भूमिका घेतली आहे का? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

हिंमत असेल तर जनतेशी संवाद साधावा

नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे. विरोध करणारे हजारो लोक आहेत. हिंमत असेल तर राज यांनी त्यांची ही भूमिका जनतेसमोर जाऊन मांडावी, असं आव्हानच त्यांनी दिलं.

लोकभावना नाणार विरोधी

लोकभावना नाणारच्या बाजूने असल्याचा भाजप आमदार नितेश राणे यांचा दावा राऊत यांनी फेटाळून लावला. लोकभावना ही नाणार विरोधातीलच आहे. नाणार परिसरातील तीन गावात ग्रामपंचायत निवडणूक झाली. नाणार विरोधक आणि नाणार समर्थक अशी ही निवडणूक होती. त्यात नाणार समर्थकांना पाच ते सात मते मिळाली. यावरून जनभावना काय आहे हे लक्षात येतं. नितेश राणेंना ही जनभावना माहीत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

प्रकल्प राज्यातच राहणार

नाणार प्रकल्प महाराष्ट्रातच राहणार आहे. राज्याच्या बाहेर जाणार नाही. त्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, हा प्रकल्प नाणारला राहणार नाही हे निश्चित, असंही ते म्हणाले.

राज ठाकरे काय म्हणाले?

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’ म्हणजे नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रं लिहिलं आहे. ‘नाणार रिफायनरी’ प्रकल्प गमावणं राज्याला परवडणारं नाही. राज्याचं अर्थचक्र गतीमान करायचं असेल तर या प्रकल्पाबाबत सामंजस्याने भूमकिा घ्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. सरकारने नाणारबाबत सकारात्मक भूमिका घेतली तर मी आणि माझा पक्ष संपूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. एवढंच नव्हे तर पर्यावरण आणि पर्यटनाच्या अनुषंगाने एक विकास आराखडा तयार करून आम्ही तो आपणांस सादर करू, असं सांगतानाच सद्यपरिस्थितीत महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठी असे निर्णय घेणं ही काळाची गरज आहे. कोणी काहीही म्हणू दे .. महाराष्ट्र फर्स्ट .. असं धडाकेबाज धोरण असायला हवं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राला परवडणार नाही

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरं तर सगळेच संदर्भ बदलले आहेत. आपल्या राज्यात, देशात गुंतवणूक यावी ह्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरु आहे. मध्यंतरी एक मोठा आंतरराष्ट्रीय प्रकल्प बेंगळुरूत गेला आणि तो महाराष्ट्रात परत यावा यासाठी महाराष्ट्र सरकारची धडपड सुरु आहे हे मी वाचलं. ही बातमी क्लेशदायक होती. आसपासची राज्यं महाराष्ट्राच्या घशात हात घालून उद्योग पळवून न्यायला टपलेली आहेत. अशा वेळेस महाराष्ट्राने ‘रत्नागिरी राजापूर रिफायनरी’ (नाणार) सारखा सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा प्रकल्प हातातून गमावू नये. हे महाराष्ट्राला आज परवडणारं नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. (Vinayak Raut slams Raj Thackeray over Nanar project)

 

संबंधित बातम्या:

पेट्रोलचे दर वाढल्याने महाराष्ट्रातील ‘या’ शहरात इलेक्ट्रिक वाहनं आऊट ऑफ स्टॉक

‘जनता महाविकासआघाडीच्या कामावर समाधानी, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावणं अशक्य’

‘नाणार प्रकल्प’ हातातून गमावू नका, राज्याला परवडणार नाही; राज ठाकरेंचं उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसांना पत्रं

(Vinayak Raut slams Raj Thackeray over Nanar project)