
मुंबई : यंदाचा (Ganesh Festival) गणेशोत्सव हा निर्बंधमुक्त झाला असला तरी या उत्सवाला आगामी (Municipal Election) महापालिका निवडणुकांची किनार असल्याचे वेळोवेळी पाहवयास मिळाले आहे. ज्या पद्धतीने (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळात हजेरी लावली आहे, त्यावरुन हे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी सत्तांतरानंतरचा बदल हा जनतेला हवाहवासा वाटत आहे. शिवाय सत्ता स्थापन झाल्यापासून 24 तास जनतेच्या सेवेचे वृत घेतल्याने निवडणुकांसाठी वेगळ्या अशा नियोजनाची गरज नाही. भाजप-शिवसेना युतीच्या सरकारकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण होत आहेत. त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कोणते पाऊल उचलण्याची गरजच भासणार नसल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर विशेषत: ठाकरे गटाच्या शिवसेनेवर खोचक टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. बंडा दरम्यान, त्यांनी जाहीर टीका केली नव्हती पण आता शब्दांचे खेळ ते शिवसेनेबरोबरही करीत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वकाही कोंदट वातावरण झाले होते. आता कसे मोकळे वातावरण झाले असून होत असलेला बदल सर्वसामान्य जनतेनेही स्वीकारला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आगामी महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही धावपळ असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. मात्र, दिवसरात्र जनतेमध्ये असल्याने निवडणूकांसाठी वेगळे असे प्लॅनिंग करण्याची आवश्यकता नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे. जे काही आहे ते जनतेसमोर आहे. त्यामुळे वेगळ्या अशा नियोजनाची गरज ही शिवसेना-भाजप युतीला नाही तर विरोधकांना असल्याचेही ते म्हणाले.
शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन झाल्यापासून सर्व सण उत्सव हे दणक्यात साजरे झाले आहेत. त्यामुळे आगामी काळातील दसरा देखील दणक्यात साजरा होणार असल्याचे म्हणत मुख्यमंत्री यांनी शिंदे गटाचाही दसरा होणार असल्याचे संकेत तर दिले आहेत, मात्र ठिकाणाबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे ते म्हणाले आहेत.