राज ठाकरेंसाठी मनसैनिक जेव्हा रस्त्यावर उतरतात….

| Updated on: Aug 21, 2019 | 8:47 PM

राज ठाकरे जेव्हा कायदेशीर कारवाईला (Raj Thackeray arrest 2008) सामोरे जातात तेव्हा त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतात हा इतिहास आहे. पण यावेळी सर्वांनी शांतता पाळावी, असं आवाहन राज (Raj Thackeray arrest 2008) यांनी अगोदरच केलंय.

राज ठाकरेंसाठी मनसैनिक जेव्हा रस्त्यावर उतरतात....
Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीने नोटीस जारी केली. आपल्या नेत्याची चौकशी होणार म्हणून मनसैनिक संतप्त आहेत. मनसेचे आंदोलन करणारे कार्यकर्ते तत्पर असल्यामुळे मुंबई पोलिसांकडून कार्यकर्त्यांना जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. राज ठाकरे सध्या फक्त चौकशीला जात आहेत. पण यापूर्वी त्यांना अटक (Raj Thackeray arrest 2008) होऊन रात्र तुरुंगातही काढावी लागली होती. राज ठाकरे जेव्हा कायदेशीर कारवाईला (Raj Thackeray arrest 2008) सामोरे जातात तेव्हा त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतात हा इतिहास आहे. पण यावेळी सर्वांनी शांतता पाळावी, असं आवाहन राज (Raj Thackeray arrest 2008) यांनी अगोदरच केलंय.

2008 ला राज ठाकरेंनी प्रांत आणि भाषा अस्मिता मुद्दा आक्रमकपणे हातात घेतला होता. यावेळी रेल्वे भरती परीक्षा ते टॅक्सी-रिक्षा, फेरीवाला रोजगारात असलेल्या परप्रांतीयांना मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर मारहाण करणे असे अनेक प्रकार घडले. मराठी अस्मिता आंदोलनात मानवाधिकार आयोगाचे उल्लंघन, तसेच हिंसेसाठी कार्यकर्त्याना चिथावणे असा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता. त्यावेळी राज ठाकरेंना अटक झाली होती. याचवेळी राज ठाकरेंवर देशात आणि राज्यात 84 ठिकाणी गुन्हा दाखल झाले होते.

मराठी अस्मितेचा मुद्दा

3 फेब्रुवारी 2008 रोजी मराठी अस्मितेच्या आंदोलनाची (mns 2008 protest) सुरुवात झाली. मनसे कार्यकर्त्यांकडून उत्तर भारतीयांना रस्त्यावर मारहाणीचे प्रकार घडले. समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर अक्षरशः धुमाकूळ घातला. मनसेचं आंदोलन हे यूपी-बिहारींच्या दादागिरीला उत्तर असल्याचं राज ठाकरेंनी त्यावेळी म्हटलं होतं.

राज्यात 2008 ला दिवंगत नेते विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. आंदोलन हाताबाहेर जाऊनही मनसे कार्यकर्त्यांना रोखणाऱ्या तत्कालीन राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात देशभरातून टीका सुरु झाली. यानंतर 13 फेब्रुवारी 2008 रोजी राज ठाकरे आणि अबू आझमी यांना हिंसाचार पसरवणे आणि चिथावणीखोर वक्तव्यांप्रकरणी अटक करण्यात आली. यानंतर लगेच त्यांची सुटकाही करण्यात आली होती.

मनसेच्या आक्रमक आंदोलनानंतर काही वृत्तांनुसार, जवळपास 25 हजार उत्तर भारतीयांनी पुण्याकडे धाव घेतली, तर 15 हजार पेक्षा जास्त उत्तर भारतीय स्वतःचा बचाव करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात गेले. यामुळे कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. उद्योगांना जवळपास 500 कोटी रुपयाचा तोटा झाल्याचं सांगितलं जातं.

उत्तर भारतीयांविरोधातील आंदोलन हाताळण्यासाठी पोलिसांनी 1800 पेक्षा जास्त मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन एवढं चिघळलं होतं, की राज्य सरकारने तेव्हा पॅरामिलिट्री फोर्सेही अलर्टवर ठेवल्या होत्या. दगडफेक, जाळपोळ यामध्ये अनेक खाजगी आणि सरकारी वाहनांचं नुकसान झालं होतं.

रेल्वे भरती आंदोलन

मराठी अस्मितेच्या मुद्द्याचं आंदोलन थंड होत नाही तोवरच मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वे परीक्षेसाठी (MNS railway protest) मुंबईत आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केली. या घटनेने पुन्हा एकदा हिंसाचाराची सुरुवात झाली. 28 ऑक्टोबर 2008 रोजी लोकल ट्रेनमध्ये एका उत्तर भारतीय कर्मचाऱ्याला जमावाने मारहाण केली होती. रेल्वे परीक्षेत मराठी मुलांवर अन्याय होत असल्याच्या भावनेतून मनसेने हे आंदोलन हाती घेतलं होतं, ज्याला नंतर हिंसक वळण लागलं.

रेल्वे भरतीत मराठी मुलांना अत्यंत अपमानजनक प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं. भरतीची जाहिरातही मराठी भाषेत दिली नव्हती. मुंबईतील परीक्षा केंद्रावर आलेले सर्वात जास्त उत्तर भारतीय होते. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी परीक्षा केंद्रावर जाऊन तोडफोड केली.

राज ठाकरेंवर या आंदोलनात हिंसाचार पसरवल्याचे गुन्हे दाखल झाले होते. अटक करुन दाखवण्याचं आव्हान त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना दिलं होतं. राज ठाकरेंना अटक करुन वांद्रे कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांना जामीन मिळाला, पण कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यातील केसमुळे त्यांना तुरुंगात रात्र काढावी लागली होती.

राज ठाकरेंना अटक केल्यानंतर मनसे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले. कलम 144 लागू करण्याचीही परिस्थिती उद्भवली होती. वांद्रे कोर्ट परिसरात पोलिसांचा निषेध करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर लाठीचार्जही करण्यात आला होता. विविध ठिकाणच्या हिंसाचाराला तोंड देण्यासाठी 20 हजारांपेक्षा पोलीस, सीआरपीएफ मुंबई शहरात तैनात करण्यात आले होते, तर 1900 पेक्षा जास्त मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती तत्कालीन पोलीस महासंचालक ए. एन. रॉय यांनी दिली होती.