IND vs ZIM: भारताला त्याचा फायदा झाला म्हणून ते जिंकले, नाही तर आम्ही जिंकलो असतो… पराभवानंतर सिकंदर रझा असा का म्हणाला?
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिकेला आता सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला टी-20 सामना आता काल पार पडला. आता पहिलाच सामना गमावल्यामुळे झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने कोणती कारण सांगितली ती पाहा...

झिम्बाब्वेला मायदेशात टीम इंडियाकडून पराभव पत्करावा लागला. झिम्बाब्वेचे फलंदाज भारतीय गोलंदाजांना प्रत्युत्तर देऊ शकले नाहीत. झिम्बाब्वे 20 षटकांत केवळ 125 धावाच करू शकले, तर वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक खेळीने भारताला सहज विजय मिळवून दिला. अखेर भारतीय संघाला खूप दिवसांनंतर टी-20 सामना जिंकण्यात यश मिळाले. कर्णधार श्रेयस अय्यरला कॅप्टन म्हणून पहिला टी-20 सामना जिंकता आला. मात्र, या पराभवानंतर झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा निराश झाला आणि त्याने पराभवाची कारणे सांगितली.
टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यरने पदभार स्वीकारल्यापासून नाणेफेक गमावलेली नाही. अय्यरने सलग आठव्या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला, खेळपट्टीने टीम इंडियाचे वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि प्रिन्स यादव यांना मदत केली, ज्यामुळे झिम्बाब्वेच्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळता आले नाही. पराभवानंतर झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा म्हणाला की, “खेळपट्टी अपेक्षेप्रमाणे नव्हती आणि सकाळच्या सत्रात ओलाव्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत होता. सुरुवातीला चौकार न लागल्याने चेंडू नवीनच राहिला आणि विकेट्स पडत राहिल्या.”
सिकंदर रझाच्या विधानावरून हे स्पष्ट होते की खेळपट्टी भारतीय वेगवान गोलंदाजांना अनुकूल होती आणि दोन वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या मयंक यादवने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. यामुळे तो भारतासाठी टी- 20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर दोन विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज ठरला. मयंकने चार षटकांत 18 धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या आणि प्रिन्स यादवनेही चार षटकांत 19 धावा देऊन दोन विकेट्स घेत झिम्बाब्वेला 125 धावांवर रोखले.
झिम्बाब्वेविरुद्ध 126 धावांचा पाठलाग करताना, टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीने चार चौकार आणि चार षटकारांसह 19 चेंडूंमध्ये 50 धावांची वेगवान खेळी केली. यामुळे तो वयाच्या 15 वर्षे आणि 118 दिवसांत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकावणारा जगातील पहिला फलंदाज ठरला. वैभवच्या खेळीमुळे सामना सोपा झाला आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली सहा टी- 20 सामने गमावल्यानंतर भारताने आपला पहिला विजय मिळवला. आता दुसरा सामना उद्या रंगणार आहे.
