अशोक पर्व… आदर्श घोटाळ्याने वादात… कसा आहे अशोक चव्हाण यांचा राजकीय प्रवास?

| Updated on: Feb 12, 2024 | 5:27 PM

काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाण्याची चिन्हे आहेत. आज त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मोबाईल बंद ठेवला. त्यामुळे चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून ते भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीवर टाकलेला हा प्रकाश...

अशोक पर्व... आदर्श घोटाळ्याने वादात... कसा आहे अशोक चव्हाण यांचा राजकीय प्रवास?
ashok chavan
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राजकीय वारसा घरातूनच मिळाला. राजकीय पीच तयारच मिळाल्यामुळे त्यांना सहज बॅटिंग करता आली. वडिलांनंतर तेही राज्याचे मुख्यमंत्री झाले. पण आदर्श घोटाळ्यामुळे अशोक चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे चव्हाण अडगळीत फेकले गेले. त्यांचं राजकारण संपल्याचंही बोललं जात होतं. पण या कठिण प्रसंगाला ते धैर्याने सामोरे गेले आणि राजकारणात दमदार पुनरागमनही केलं. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतरच्या दुसऱ्या इनिंगमध्ये खासदार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशी पदे भूषवितानाच आता ते ठाकरे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले होते. आता चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण यांचं राजकीय करिअर कसं राहिलं आहे, यावर टाकलेला हा प्रकाश…

मूळ औरंगाबादमध्ये

अशोक चव्हाण यांचे मूळ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात आहे. मात्र त्यांचे पूर्वज नांदेडमध्ये स्थायिक झाले. तेव्हापासून चव्हाण घराणं आणि नांदेड हे समीकरणच झालं आहे. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण राज्याचे दोनवेळा मुख्यमंत्री होते. शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठं योगदान दिलं आहे. तसेच काँग्रेसला वाढवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शंकरराव चव्हाणांमुळे काँग्रेस मराठवाड्यात मजबूत झाली. सत्ताविरोधी लाट असतानाही केवळ चव्हाणांच्या खंबीर नेतृत्वामुळेच काँग्रेसला मराठवाड्यातून कुणी हटवू शकले नव्हते.

पिता-पूत्र मुख्यमंत्री, पहिल्यांदाच घडलं

अशोक चव्हाण यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1958 रोजी मुंबईत झाला. त्यांनी बीएसस्सी आणि एमबीए या दोन पदव्या घेतल्या आहेत. शंकरराव चव्हाणांचा राजकीय वारसा त्यांच्या दोन शिष्यांना मिळाल्याचं राजकीय जाणकार सांगतात. एक म्हणजे विलासराव देशमुख आणि दुसरे म्हणजे चव्हाण यांचे चिरंजीव अशोक चव्हाण. चव्हाणांचे हे दोन्ही शिष्य पुढे राज्याचे मुख्यमंत्री झाले. वडिलांनंतर अशोक चव्हाणही राज्याचे मुख्यमंत्री झाले. राज्याच्या इतिहासात मुख्यमंत्री बनणारी पिता-पुत्रांची ही पहिलीच जोडी आहे.

महासचिव म्हणून करियरला सुरुवात

अशोक चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीला 1985पासून सुरुवात झाली. 1986-1995 या काळात ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. मात्र 1987 ते 1989 दरम्यान संसदीय राजकारणाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पक्ष कार्यातही भाग घेण्यास सुरुवात केली. 1987मध्ये ते नांदेड लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा विजयी झाले. वयाच्या 30व्या वर्षीच ते खासदार बनले. भारिपचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात निवडणूक लढवून ते संसदेत पोहोचले होते. 1992 मध्ये ते विधानपरिषदेचे सदस्य बनले. 1993 मध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री बनले. 1995 ते 1999 पर्यंत ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव होते. त्यानंतर 2003मध्ये ते विलासराव देशमुख सरकारमध्ये मंत्री बनले.

मतदारसंघावर कुटुंबाचंच वर्चस्व

नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. नांदेड लोकसभेत अपवाद वगळता काँग्रेसचा नेहमीच विजय झाला आहे. लोकसंपर्क, संस्थात्मक जाळं आदीच्या बळावर चव्हाण यांनी हा बाल्लेकिल्ला राखला आहे. सध्या ते भोकर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण देखील भोकरचे आमदार होते. तर अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता यांनीही विधानसभेत भोकरचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

विलासराव गेले, अशोकराव आले

2008मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीत अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली. देशमुख गेल्यामुळे मराठवाड्यातूनच मुख्यमंत्री देण्याचा निर्णय झाल्याने चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे आली. विशेष म्हणजे त्यावेळी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे सुद्धा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. तसेच शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले नारायण राणे हे सुद्धा या पदाचे दावेदार होते. तरीही काँग्रेस हायकमांडने चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद दिलं. त्यावरून चव्हाण यांचं दिल्ली दरबारी असलेलं वजन दिसून येतं.

‘अशोक पर्व’ने अडचणीत

2009च्या विधानसभा निवडणुकीत ‘अशोक पर्व’ नावाच्या पुरवणीसाठी पेड न्यूज दिल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते. निवडणूक आयोगाने या पेड न्यूजची गंभीर दखल घेतली होती.

आदर्श घोटाळ्यामुळे मुख्यमंत्रीपद गेलं

चव्हाण मुख्यमंत्री असताना आदर्श घोटाळा उघड झाला. कारगिल युद्धातील विधवांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्याचा चव्हाणांवर आरोप झाला. त्यामुळे त्यांना 2010मध्ये मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. दरम्यान, या प्रकरणात तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी चव्हाणांच्या सीबीआय चौकशीची परवानगी नाकारली होती. परंतु, त्यानंतर आलेले राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सीबीआयला याप्रकरणाची चौकशी करण्यास परवानगी दिली होती. मात्र नंतर न्यायालयानेच चव्हाण यांच्याविरोधात खटला चालवण्यास नकार दिला. त्यामुळे चव्हाण यांना मोठा दिलासा मिळाला होता. (Who is Ashok Chavan? know about his political life)

वनवास आणि कमबॅक

अशोक चव्हाण 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 म्हणजे दीड वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. आदर्श घोटाळ्यात नाव आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर चव्हाण यांच्या राजकीय वनवासाला सुरुवात झाल्याचं जाणकार सांगतात. मात्र, चार वर्षानंतर त्यांनी पुन्हा एकदा राजकारणात दमदार पुनरागमन केलं. 2014मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि प्रचंड मतांनी विजयी झाले. एवढेच नव्हे तर पुढे त्यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली. 2014च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागांपैकी काँग्रेस केवळ दोनच जागांवर विजयी होऊ शकली होती. मोदी लाटेमुळे काँग्रेसचा पूर्ण सफाया झाला होता. या दोन जागांमध्ये एक जागा नांदेडमधील होती. सध्या अशोक चव्हाण हे ठाकरे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत आहेत.