Sanjay Raut : शिवसेना कुणाची? हे ठरवण्यासाठी पुरावे सादर करावे लागतात, यासारखे दुर्देव काय? संजय राऊतांनी दिले पुरावे

| Updated on: Jul 23, 2022 | 10:36 AM

शिवसेना हा केवळ एक पक्ष नाहीतर महाराष्ट्राची अस्मिता आहे. केवळ स्वार्थासाठी आणि पक्ष फोडण्यासाठी राजकारण हे खालच्या पातळीवर गेले आहे. ज्यांनी अस्मितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे अशा बंडखोरांना जनता कधीच माफ करणार नसल्याचे राऊतांनी सांगितले आहे. 8 ऑगस्ट रोजी दुपारपर्यंत पुरावे सादर करायचे आहेत ते केले जातील.

Sanjay Raut : शिवसेना कुणाची? हे ठरवण्यासाठी पुरावे सादर करावे लागतात, यासारखे दुर्देव काय? संजय राऊतांनी दिले पुरावे
खा. संजय राऊत
Follow us on

मुंबई : आगोदर आमदार नंतर खासदार आणि आता पदाधिकारी हे (Eknath Shinde) शिंदे गटात सहभागी होत असताना या गटाने थेट (Shivsena) शिवसेना पक्षावरच दावा केला आहे. यासंदर्भात न्यायालयात सुनावणी सुरु असून दोन्ही गटांना 8 ऑगस्टपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, शिवसेना कुणाची हे ठरवण्यासाठी पुरावे सादर करावे लागतात यासारखे दुसरे दुर्देव काय? असा सवाल (Sanjay Raut) खा. संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. ही वेळ केवळ बंडखोरांमुळे आली असून महाराष्ट्रातील 11 कोटी जनता हे सर्व उघड्या डोळ्याने पाहत आहे. या गटाचा वापर करुन शिवसेना फोडण्याचे काम हे भाजप करीत असल्याचा आरोपही संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. मात्र, ज्या पक्षामुळे सर्वकाही मिळाले त्याच पक्षातील बंडखोरांमुळे ही वेळ आल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

शिवसेना कुणाची? हे घ्या पुरावे..!

शिवसेना कुणाची हे 11 कोटी जनतेला माहिती आहे. सीमाप्रश्नासाठी मेलेले 69 हुतात्मे हे सेनेचेच, हजारो आंदोलनातून शिवसैनिक शहिद झाला, तुरुंगात गेला हा पुरावा आहे… 1992 च्या दंगलीत हजारो शिवसैनिकांवर खटले दाखल झाले, लोक मारले गेले हा पुरावा आहे. मराठी माणसाच्या रक्तामध्ये शिवसेना आहे हा पुरावा… पक्षातून 10 ते 20 लोक फोडले ते देखील पैसे आणि दहशतीने हा पुरावा होऊ शकत नसल्याचे राऊतांनी सांगितले आहे. ही सर्व रणनिती भाजपाची असून ते शिवसेना पक्षातील लोकांचा असा वापर करुन घेत आहेत हे दुर्देवी असल्याचेही राऊत म्हणाले.

जनता माफ करणार नाही

शिवसेना हा केवळ एक पक्ष नाहीतर महाराष्ट्राची अस्मिता आहे. केवळ स्वार्थासाठी आणि पक्ष फोडण्यासाठी राजकारण हे खालच्या पातळीवर गेले आहे. ज्यांनी अस्मितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे अशा बंडखोरांना जनता कधीच माफ करणार नसल्याचे राऊतांनी सांगितले आहे. 8 ऑगस्ट रोजी दुपारपर्यंत पुरावे सादर करायचे आहेत ते केले जातील. आता निकाल न्यायालयाच्या हातामध्ये आहे. मात्र, शिवसेना कुणाची हे न्यायालयात सांगावे लागत असले तरी राज्यातील 11 कोटी जनतेला सेना कुणाची हे चांगल माहित आहे. त्यामुळे भाजपाला हाताशी धरुन असले खेळ खळले जात आहेत हेच दुर्देवी असल्याचे राऊतांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

केंद्रीय यंत्रणावरही प्रश्नचिन्ह

शिवसेना कुणाची हा मुद्दा सध्या न्यायालयात असला तरी केंद्रीय यंत्रणाबाबत नव्याने सांगण्याची गरज नसल्याचे म्हणत राऊतांनी या यंत्रणाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. लोकसभेचे अध्यक्ष बिर्ला यांना विनायक राऊत यांनी तीन वेळा पत्र दिले पण त्यांनी स्वीकारले नाही पण फुटीर गट जातो आणि त्यासंदर्भात लागलीच निर्णय घेतला जातो. 24 तासात त्यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळत असेल तर कोणते पुरावे सादर करावे असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे