आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदेंमधील वाद पक्षाला भोवला? …म्हणून शिंदेंनी केली बंडखोरी!

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडोखोरी का केली? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र विधानपरिषद निवडणुकीच्या दोन दिवस आधी एकनाथ शिंदे यांचा आदित्य ठाकरेंसोबत वाद झाला होता, अशी माहिती देखील आता समोर येत आहे.

आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदेंमधील वाद पक्षाला भोवला? ...म्हणून शिंदेंनी केली बंडखोरी!
| Updated on: Jun 22, 2022 | 1:08 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून पाहिलं जातं. शिवसेना (SHIVSENA)  वाढवण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सहभाग होता. शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांना अत्यंत मानाचं स्थान होतं. उद्धव ठाकरेनंतर शिवसेनेमधील नंबर दोनचा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिले जात होतं. सर्व अलबेल सुरू असताना असं आचानक काय झालं की एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केला, असा प्रश्न अनेकांना पडतो मात्र त्यामागे अनेक कारणे आहेत. हे काही एकाच दिवसामध्ये घडून आलं नाही. महाविकास आघाडीसोबत जाऊन शिवसेनेने सत्ता स्थापन केली तेव्हापासूनच एकनाथ शिंदे हे पक्षावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. सत्तावाटपात अनेक महत्त्वाची खाती ही राष्ट्रवादीला (NCP) मिळाली. त्यामुळे शिंदे हे नाराज होते. पाहुयात काही महत्त्वाची कारण ज्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज होते. या नाराजीचा विस्फोट झाला आणि एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केले.

खाते वाटपामुळे नाराजी

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेने भाजपासोबत न जाता, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. राज्यात महाविकास आघाडी नावाचा नवीन प्रयोग अस्थित्वात आला. मात्र खाते वाटपामध्ये अनेक महत्त्वाची खाती ही राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली. यावरून एकनाथ शिंदे हे नाराज होते.

समान निधीचा प्रश्न

महाविकास आघाडीमध्ये निधीचे असमतोल वाटप होत असल्याची तक्रार अनेक शिवसेना आमदारांकडून करण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या आमदारांना भरघोस निधी मिळतो. मात्र शिवसेनेच्या आमदारांना पुरेसा निधी मिळत नसल्याचा  उघड आरोप शिवसेनेच्या काही आमदारांनी केला होता. आमदार देखील महाविकास आघाडीवर नाराज होते.

शिंदे आणि आदित्य ठाकरेंमध्ये वाद

विधानपरिषद निवडणुकीच्या दोन दिवस आधी आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वाद झाल्यची बातमी समोर येत आहे. विधान परिषदेमध्ये मतदान कसे करावे यासाठी एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला उद्धव ठाकरे हजर नव्हते. यावरून  एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत बीबीसी मराठी या वृत्तवाहिनीकडून माहिती देण्यात आली आहे.

आदित्य ठाकरेंचे पक्षातील वाढते महत्त्व

आदित्य ठाकरे यांचे पक्षातील महत्त्व वाढत चालले होते, यामुळे आपले पक्षातील स्थान धोक्यात येते की काय अशी भीती एकनाथ शिंदेंना वाटत असावी अशी देखील चर्चा आहे. अशा अनेक कारणांमुळे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याचे मानले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us