CM Eknath Shinde: होय मी कंत्राटी मुख्यमंत्री, या राज्याचा विकास करण्याचे कंत्राट, उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं काय उत्तर?

घटनात्मक तरतुदी पूर्ण करुनही मुख्यमंत्री हे कंत्राटी वाटत असेल तर होय आपण कंत्राटी मुख्यमंत्री आहे, असे त्यांनी सांगितले. राज्यातील जनतेच्या विकासाचं कंत्राट आपण घेतलं असल्याचं त्यांनी सांगितलं. बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व पुढे नेण्याचं कंत्राट आपण घेतलं असल्याचंही शिंदे यांनी सांगितले.

CM Eknath Shinde: होय मी कंत्राटी मुख्यमंत्री, या राज्याचा विकास करण्याचे कंत्राट, उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं काय उत्तर?
विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 25, 2022 | 5:34 PM

मुंबई- असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री कधीही बरा, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. राज्यात वैचारिक दिवाळखोरीतून विरोधक टीका करत आहेत, असा आरोपही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. सर्व घटनात्मक तरतूदी, सोपस्कार पार पाडून, बहुमत सिद्ध करुन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, असेही शिंदे यांनी सभागृहात सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)भरल्या ताटावरुन अटक करण्यात आली होती. याची आठवणही शिंदे यांनी करुन दिली. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलले म्हणून ही अटक करण्यात आल्याची टीकाही शिंदे यांनी केली.

होय मी कंत्राटी मुख्यमंत्री- एकनाथ शिंदे

घटनात्मक तरतुदी पूर्ण करुनही मुख्यमंत्री हे कंत्राटी वाटत असेल तर होय आपण कंत्राटी मुख्यमंत्री आहे, असे त्यांनी सांगितले. राज्यातील जनतेच्या विकासाचं कंत्राट आपण घेतलं असल्याचं त्यांनी सांगितलं. बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व पुढे नेण्याचं कंत्राट आपण घेतलं असल्याचंही शिंदे यांनी सांगितले. हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं कंत्राट, सर्वसामानम्य जनतेला न्याय देण्याचं आणि आश्रू पुसण्याचं, लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचं कंत्राट आपण घेतलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे. सध्या वैचारिक दिवाळखोरीतून हिणवणे सुरु आहे, मात्र आम्ही कामाने उत्तर देऊ असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

राज्यात वीज कंत्राटी कामगारांचा, प्रश्न गंभीर झालेला असल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले होते. कंत्राटी कामगारांप्रमाणेच मुख्यमंत्री हेही कंत्राटी आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्या पदावर किती काळ आहेत हे त्यांनाच माहित नसल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. त्याचबरोबर भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे की चोरबाजार आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली होती.