Sarojini Naidu Memorial Day : ‘भारताच्या कोकिळा’ सरोजिनी नायडू यांचा आज स्मृतिदिन

| Updated on: Mar 02, 2022 | 7:00 AM

सरोजिनी नायडू या बालपणापासूनच कुशाग्र विद्यार्थिनी होत्या. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांनी 12वीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. हैदराबादच्या निजामाने दिलेल्या शिष्यवृत्तीसह सरोजिनी यांना पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्यात आले.

Sarojini Naidu Memorial Day : भारताच्या कोकिळा सरोजिनी नायडू यांचा आज स्मृतिदिन
'भारताच्या कोकिळा' सरोजिनी नायडू यांचा आज स्मृतिदिन
Follow us on

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा, राजकीय नेत्या, महिला हक्कांच्या समर्थक आणि स्वातंत्र्यसैनिक सरोजिनी नायडू (Sarojini Naidu) यांचा आज (2 मार्च) स्मृतिदिन (Memorial Day). प्रभावी भाषण आणि प्रभावी लेखनामुळे देशात त्यांना ‘भारताचे कोकिळा’ म्हटले गेले. 13 फेब्रुवारी 1879 रोजी हैदराबाद येथे जन्मलेल्या सरोजिनी यांचे वडील अघोरेनाथ चट्टोपाध्याय हे निजामाच्या महाविद्यालयाचे संस्थापक आणि रसायनशास्त्राचे शास्त्रज्ञ होते. तसेच त्यांच्या आई वर्धा सुंदरी या कवयित्री होत्या. त्या बंगाली भाषेत कविता लिहायच्या. त्याच्या वडिलांची इच्छा होती की सरोजिनी यांनी आपल्याप्रमाणे शास्त्रज्ञ किंवा गणितज्ञ व्हावे. पण सरोजिनी कवितेच्या प्रेमात पडल्या. सरोजिनी यांचा पहिला कवितासंग्रह ‘गोल्डन थ्रेशोल्ड’ (1905) या नावाने प्रकाशित झाला. तो आजही वाचकांमध्ये लोकप्रिय आहे. ‘बर्ड ऑफ टाईम’ आणि ‘ब्रोकन विंग्ज’ या त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या काव्यसंग्रहांनी त्यांना एक प्रसिद्ध कवयित्री बनवले. (Supporters of women’s rights and freedom fighters Sarojini Naidu’s Memorial Day Today)

सरोजिनी नायडू यांचे शिक्षण

सरोजिनी नायडू या बालपणापासूनच कुशाग्र विद्यार्थिनी होत्या. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांनी 12वीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. हैदराबादच्या निजामाने दिलेल्या शिष्यवृत्तीसह सरोजिनी यांना पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्यात आले. सरोजिनी यांनी प्रथम लंडनमधील किंग्ज कॉलेज आणि नंतर केंब्रिजमधील गिर्टन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. 1895 मध्ये त्या उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्या.

महिला सक्षमीकरणाच्या कार्यामध्ये अग्रेसर

सरोजिनी यांनी महिलांच्या हक्कांसाठी नेहमीच संघर्ष केला होता. त्यामुळे त्यांचा वाढदिवस राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. 13 फेब्रुवारी 2014 रोजी सरोजिनी नायडू यांच्या 135 व्या जयंतीपासून भारतात राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. महिला सक्षमीकरणाच्या कार्याची आधुनिक युगात सुरुवात झालेली नाही, तर अनेक दशकांपासून ते भारतीय समाजाचा एक भाग आहे. स्वातंत्र्यलढ्यात अनेक महिलांनी सक्रिय योगदान देऊन हे सिद्ध केले आहे की, महिला ही समाजातील दुर्बल घटक नसून त्या सशक्त घटक आहेत, महिलांच्या सहभागाशिवाय कोणतेही कार्य अपूर्ण आहे.

स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचा वाटा

सरोजिनी नायडू यांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचा वाटा उचलला. त्यामुळे त्यांची विशेष ओळख निर्माण झाली. त्यांनी अनेक राष्ट्रीय चळवळींचे नेतृत्व केले. त्यांना तुरुंगातही जावे लागले. मात्र त्या संकटांना घाबरून गेल्या नाहीत. त्यांनी गावोगावी फिरून देशभक्तीची भावना जागृत केली, देशवासीयांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून दिली. तळागाळातील जनतेला देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा त्यांनी दिली. त्या बहुभाषिक होत्या. विविध भाषांचे चांगले ज्ञान होते. त्याच जोरावर त्यांनी प्रदेशानुसारइंग्रजी, हिंदी, बंगाली किंवा गुजराती अशा वेगवेगळ्या भाषांमधून भाषणे दिली. लंडनच्या सभेत त्यांनी इंग्रजीत भाषण करून उपस्थित सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते. एकूणच त्यांच्या महान कार्यामुळे देशाच्या इतिहासात 2 मार्च 1949 हा दिवस सरोजिनी नायडू यांची पुण्यतिथी म्हणून नोंद आहे. स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!! (Supporters of women’s rights and freedom fighters Sarojini Naidu’s Memorial Day Today)

इतर बातम्या

World Civil Defence Day : काळाच्या ओघात नागरी संरक्षण व्यवस्थेतेचे वाढते महत्व, काय आहे उद्देश?

National Science Day : 28 फेब्रुवारीलाच का होतो ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा? काय आहेत कारणे अन् उद्देश?