
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य या ग्रंथामध्ये म्हणतात की या जगात जेवढ्या व्यक्ती असतात तेवढ्या प्रवृत्ती देखील असतात. काही लोक हे स्वभावाने खूप चांगले असतात. ते आपल्याबद्दल नेहमी चांगलाच विचार करतात. मात्र काही लोक हे मुळातच धूर्त आणि कपटी असतात. असे लोक आपल्या फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे असे लोक तुम्हाला वेळीच ओळखता आले पाहिजेत, जर अशा लोकांसोबत तुम्ही मैत्री केली तर भविष्यात त्याचा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. असे लोक आपल्या स्वत:च्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे, तसेच हे लोक कसे ओळखायचे यासाठी देखील चाणक्य यांनी अशा लोकांची काही लक्षणं सांगितली आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात.
स्वार्थी लोक – चाणक्य म्हणतात असे लोक तुमच्या आसपास सर्वत्र आढळून येतात, यामध्ये मग कोणी तुमचे मित्र असतील, कोणी तुमचे नातेवाईक सुद्ध असू शकतात. जोपर्यंत या लोकांना तुमच्यापासून फायदा दिसतोय, तोपर्यंतच हे लोक तुमच्यासोबत असतात. जर या लोकांना वाटलं की आता तुमच्यापासून फायदा नाही, तेव्हा असे लोक पुन्हा तुमच्याकडे फिरकणार सु्द्धा नाहीत. त्यामुळे अशा लोकांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
कपटी लोक – चाणक्य म्हणतात असे लोक तर सर्वात जास्त धोकादायक असतात. या लोकांच्या मनात कायम कपटाची भावना असतो. असे लोक तुम्हाला कुठेही संकटात आणू शकतात. त्यामुळे असे लोक वेळीच ओळखावेत आणि त्यांच्यापासून लांब राहावं, त्यातच आपलं हीत आहे.
तुमच्यावर जळणारे लोक – चाणक्य म्हणतात काही लोक असे असतात ज्यांना तुमची प्रगती सहन होत नाही, ते लोक तुमचा मत्सर करतात. तुम्हाला मागं खेचण्यासाठी प्रयत्न करतात. अशा लोकांपासून नेहमी सावध रहावं, तसेच अशा लोकांना तुमच्या कोणत्याही गुप्त योजना सांगू नयेत, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)