Hindu Funeral Rites: अंत्यसंस्काराच्या वेळी पाण्याने भरलेले मडकं का फोडलं जातं?

Hindu Cremation Rituals: अंत्यसंस्कार करताना काही विशेष नियमांचे पालन केले जाते, ज्यामध्ये अंत्यसंस्काराच्या आधी पाण्याने भरलेले मातीचे मडके फोडण्याचा विधी समाविष्ट आहे. चला या विधीबद्दल आणि अंत्यसंस्काराच्या वेळी तो का पाळला जातो याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया...

Hindu Funeral Rites: अंत्यसंस्काराच्या वेळी पाण्याने भरलेले मडकं का फोडलं जातं?
Funeral
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 13, 2026 | 6:53 PM

हिंदू धर्मात मानवी आयुष्याशी जोडलेले 16 संस्कार सांगितले गेले आहेत. त्यातील शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार. व्यक्तीच्या देहाला शेवटचा निरोप देताना हा विधी केला जातो. श्रद्धेनं आणि विधीपूर्वक केलेल्या या संस्कारामुळे आत्म्याला शांती मिळते. तसेच पुढील प्रवासासाठीचा मार्ग मोकळा होतो, अशी भावना असते. अंत्यसंस्काराच्या वेळी काही विशिष्ट नियमांचे पालन केले जाते. त्यापैकी एक महत्त्वाची प्रथा म्हणजे मुखाग्नी देण्यापूर्वी पाण्याने भरलेले मातीचे मडके फोडणे. या कृतीमागे धार्मिक आणि आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. चला तर मग, या प्रथेचे महत्त्व आणि ती का पाळली जाते, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

नेमकं काय आहे कारण?

धर्मशास्त्रांनुसार, अंत्यसंस्काराच्या वेळी मृत व्यक्तीचे शरीर अग्निला अर्पण केले जाते. यालाच ‘मुखाग्नी देणे’ असे म्हणतात. मात्र त्याआधी एक विशेष विधी केला जातो. छिद्र पाडलेला मातीचा घडा पाण्याने भरून तो खांद्यावर घेतला जातो आणि चितेभोवती दक्षिण दिशेने प्रदक्षिणा घातली जाते. शेवटी एक प्रदक्षिणा घड्याळाच्या उलट दिशेने करण्याचा नियम आहे. त्यानंतर पाण्याने भरलेले मडके मागे फेकले जाते. मडके जमीनीवर आपटल्यामुळे फुटते.

त्यानंतर मृतदेहाला मुखाग्नी दिला जातो. अंत्यसंस्कारातील हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शास्त्रांनुसार, मातीचे मडके हे मृत शरीराचे प्रतीक मानले जाते. तसेच त्यामधील पाणी आत्म्याचे प्रतीक समजले जाते. प्रदक्षिणेदरम्यान मडक्यातून हळूहळू गळणारे पाणी हे शरीर आणि आत्मा यांच्यातील नाते कमकुवत होत जाऊन अखेरीस संपुष्टात येण्याचे प्रतीक मानले जाते.

मडके फोडण्यामागील धार्मिक कारण?

मडके फुटणे म्हणजे आत्म्याने शरीरापासून पूर्णपणे विलग होऊन पुढील प्रवासाला निघण्याची वेळ आल्याचे प्रतीक आहे. मानवी शरीर पंचतत्त्वांत विलीन होते, अशी श्रद्धा आहे. घडा फोडण्याची क्रिया दर्शवते की मृत व्यक्तीचे या जगातील सर्व सांसारिक संबंध आता समाप्त झाले आहेत आणि त्याने मोक्षमार्गाकडे प्रस्थान केले आहे.