Krishna Janmashtami 2022: दुर्योधन आणि श्रीकृष्ण होते व्याही, महाभारतातील ही कथा अनेकांना नाही माहिती

| Updated on: Aug 18, 2022 | 8:20 AM

भागवत पुराणानुसार दुर्योधनाच्या मुलीचे नाव लक्ष्मणा होते. दुर्योधनाने आपल्या मुलींसाठी स्वयंवर रचिले होते. भगवान श्रीकृष्णाचा पुत्र सांबही त्या स्वयंवरात आला होता. सांब आणि लक्ष्मणा यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते, परंतु दुर्योधनाला सांब हा जावई म्हणून पसंत नव्हता. दुर्योधनाचा या लग्नाला विरोध होता.

Krishna Janmashtami 2022: दुर्योधन आणि श्रीकृष्ण होते व्याही, महाभारतातील ही कथा अनेकांना नाही माहिती
महाभारतातला एक क्षण
Image Credit source: Social Media
Follow us on

Krishna Janmashtami 2022: दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्री कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो. या वर्षी आज 18 आणि 19 ऑगस्ट रोजी हा उत्सव साजरा केला जाणार आहे. आजच्या दिवशी कृष्ण मंदिरांमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.  श्री कृष्णाबद्दल  सर्वांनाच माहिती आहे, पण त्यांच्या कुटुंबाबद्दल (Family of Shri Krushna) फार कमी लोकांना माहिती आहे. भागवत पुराणात भगवान श्रीकृष्णाचे संपूर्ण कुटुंबाबद्दल माहिती सांगितली आहे.  श्रीकृष्णाचे आठ विवाह झाले होते, असे म्हटले जाते. रुक्मिणी, जामवंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रबिन्दा, सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा. यांना श्रीकृष्णकृपेने मुलेही झाली. हस्तिनापूरचे राजा राजा धृतराष्ट्र यांचा मुलगा दुर्योधन आणि श्रीकृष्ण व्याही होते (Duryodhana and Shri Krushna Relation) , अशी एक कथा सापडते.

 

श्रीकृष्ण आणि दुर्योधन कसे झाले व्याही?

 

हे सुद्धा वाचा

भागवत पुराणानुसार दुर्योधनाच्या मुलीचे नाव लक्ष्मणा होते. दुर्योधनाने आपल्या मुलींसाठी स्वयंवर रचिले होते. भगवान श्रीकृष्णाचा पुत्र सांबही त्या स्वयंवरात आला होता. सांब आणि लक्ष्मणा यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते, परंतु दुर्योधनाला सांब हा जावई म्हणून पसंत नव्हता. दुर्योधनाचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे सांब याने लक्ष्मणाचे अपहरण केले आणि पळून जाऊन लग्न केले. विवाहाची गोष्ट दुर्योधनाला समजली, तेव्हा त्याचा पारा चढला आणि हस्तिनापूरचे सैन्य घेऊन त्याने सांबवर आक्रमण केले. हस्तिनापूरच्या सैन्याशी सांब एकटा लढू लागला. मात्र, प्रचंड सैन्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. अखेर त्याचा पराभव झाला. कौरव सांबाला पकडून घेऊन गेले आणि कैदेत टाकले. कौरवांनी सांबाला कैद केल्याची वार्ता द्वारकेत पोहोचली. नेमके काय घडले, हे पाहण्यासाठी बलराम हस्तिनापूर येथे पोहोचला. मध्यस्थी करून हे प्रकरण शांततेने मिटवावे, असे बलरामाला वाटत होते. सांबला सोडून द्यावे आणि नववधूला द्वारकेला पाठवावे, असे बलरामाने सांगितले.

 

अखेर बलरामाचे ऐकावेच लागले

बलरामाच्या प्रस्तावाला मात्र कौरवांनी साफ नकार दिला आणि बलरामाचा अपमान केला. काही झाले, तरी कौरव ऐकायला तयार नव्हते. शेवटी बलराम भयंकर क्रोधित झाला. बलरामाने रौद्र रुप धारण केले. कौरवांनी माझे म्हणणे ऐकले नाही, तर हस्तिनापूर नगरी गंगा नदीत बुडवेन, असे आव्हान बलरामाने दिले. मात्र, कौरव ऐकले नाहीत. शेवटी बलरामाने हस्तिनापुरावर नांगर फिरवायला सुरुवात केली आणि हस्तिनापूर नगरी गंगेत बुडवण्यास सुरुवात केली.

बलरामाच्या प्रहारामुळे हस्तिनापुरात हाहाकार माजला. सर्व नागरिक जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धावू लागले. बलरामाचे रौद्र रुप पाहून कौरव अत्यंत भयभीत झाले. बलरामाच्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ते तयार झाले. कौरवांनी सांबची मुक्तता केली आणि लक्ष्मणाला द्वारकेला पाठवण्यासही संमती दिली. बलरामाचा राग शांत झाला. त्याने कौरवांना माफ केले आणि सांब-लक्ष्मणाला घेऊन द्वारकेला परतला. द्वारकेत आल्यावर दोघांचाही वैदिक पद्धतीने विवाह लावून देण्यात आला.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)