गिरीश महाजन यांना ‘कुंभमेळा मंत्री’ करण्यास साधू महंतांचा विरोध, देवाभाऊंच्या निर्णयाकडे लागले लक्ष

कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी सरकार आणि प्रशासनाकडे आधीच कमी दिवस शिल्लक असतांनाच दुसरीकडे अशाप्रकारे नवनवीन वाद उफाळून येत आहेत. नाशिकचा कुंभमेळा आदर्श व्हावा यादृष्टीने आपापसातील भांडण आणि तंटे मिटवून सर्वांनी एकदिलाने आणि एकजुटीने एकत्र यावे असे आवाहन सर्वसामान्य जनतेने केले आहे.

गिरीश महाजन यांना कुंभमेळा मंत्री करण्यास  साधू महंतांचा विरोध, देवाभाऊंच्या निर्णयाकडे लागले लक्ष
Nashik - Trimbakeshwar nashik kumbhamela 2025
| Updated on: Mar 26, 2025 | 8:04 PM

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार आणि प्रशासन जोरदार तयारीला लागलेले आहे. त्यातच आता नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या नामकरणावरून सध्या साधू महंतांमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या साधूंनी थेट ‘कुंभमेळा मंत्री’ या नव्या पदालाच विरोध करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच संपूर्ण कारभार हाती घ्यावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसा यांच्या भूमिकेकडे आता सगळ्याचं लक्ष लागले आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराजला नुकताच महाकुंभमेळा साजरा झाला. जगभरातून आलेल्या साठ कोटीहून अधिक भाविकांमुळे या सोहळ्याला जागतिक महत्व प्राप्त झाले होते.दरम्यान प्रयागराजच्या धर्तीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला होऊ घातलेल्या कुंभमेळ्याचे नियोजन करण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून जोरदार हालचाली सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच यामध्ये लक्ष घातलं असून नुकताच त्यांचा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा देखील दौरा पार पडला आहे.

मुख्यमंत्र्यांनीच संपूर्ण कुंभचा कारभार पाहावा

साधू महंत आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेत सर्व कामे वेगाने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे कुंभमेळा यशस्वी पार पाडावा या याकरिता भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे ‘कुंभमेळा मंत्री’ हे विशेष खातेही देण्यात आले आहे. मात्र, हे पद साधू महंतांना मान्य नाही. उत्तरप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनीच संपूर्ण कुंभचा कारभार पाहावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

ते कोणतेही महंत किंवा साधू नाहीत

त्र्यंबकेश्वरच्या साधुमहंतांनी आगामी कुंभमेळ्याला ‘त्र्यंबकेश्वर नाशिक; असे संबोधावे अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रशासनाकडे केली आहे. तर नाशिकच्या महंतांनी ‘नाशिक – त्र्यंबकेश्वर’ हेच नाव योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे.. विशेष म्हणजे हा वाद आता इतका टोकाला गेला आहे की नाशिकचे महंत सुधीरदास पुजारी आणि अनिकेत शास्त्री देशपांडे स्वतः बोगस असून ते कोणतेही महंत किंवा साधू नसल्याचा आरोप त्र्यंबकेश्वरच्या आखाडा परिषदेने केला आहे.

विनाकारण बदनाम करण्याचे हे षडयंत्र

या आरोपानंतर सुधीरदास पुजारी यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद घेत त्र्यंबकेश्वरच्या साधूंनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. महंतची पदवी मिळाल्याचे प्रमाणपत्र आणि फोटोच त्यांनी दाखवत मला विनाकारण बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हटल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. यासोबतच त्र्यंबकेश्वरला ज्या आखाडा परिषदेच्या नावाखाली ही बैठक झाली ती आखाडा परिषद मुळात अस्तित्वातच नसल्याचा आरोपही महंत सुधीरदास पुजारी यांनी केले आहेत.

 

Follow Us