Surya Grahan: 11 की 12 ऑगस्ट, या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण कधी? भारतात सूतक काळ लागू होईल का?

Surya Grahan 2026: या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण नेमकं 11 ऑगस्टला की 12 ऑगस्टला होणार आहे, भारतात सूतक काळ लागू होईल की नाही, याविषयीची सविस्तर माहिती जाणून घ्या..

Surya Grahan: 11 की 12 ऑगस्ट, या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण कधी? भारतात सूतक काळ लागू होईल का?
Surya Grahan 2016
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 05, 2026 | 3:23 PM

Surya Grahan 2026: या वर्षातील दुसरी आणि सर्वांत महत्त्वाची खगोलीय घटना म्हणजेच खग्रास सूर्यग्रहण येत्या 12 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे. ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्राच्या दृष्टीकोनातून हे सूर्यग्रहण खूप विशेष मानलं जातं. खग्रास सूर्यग्रहणात चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून टाकणार असल्याने दिवसा पृथ्वीचा काही भाग अंधारात बुडेल. 12 ऑगस्ट रोजी होणारं हे खग्रास सूर्यग्रहण प्रामुख्याने उत्तर गोलार्धातील भागात दिसणार आहे. ग्रीनलँड, आइसलँड, स्पेन, रशिया आणि अटलांटिक महासागराच्या काही भागांमध्ये हे ग्रहण स्पष्टपणे दिसेल. तर युरोपचा बहुतांश भाग, उत्तर अमेरिकेचा काही भाग आणि वायव्य आफ्रिकेत ते खंडग्रास सूर्यग्रहण म्हणून दिसेल.

हे सूर्यग्रहण भारतात दिसणार का?

12 ऑगस्ट 2026 रोजी होणारं हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. भारतीय प्रमाण वेळेनुसार हे ग्रहण रात्री होणार असल्याने ते भारतात दिसणार नाही.

सूर्यग्रहणाची वेळ

भारतीय प्रमाण वेळेनुसार, सूर्यग्रहण 12 ऑगस्ट रोजी रात्री 9.04 ते पहाटे 1.27 पर्यंत असेल. रात्री 11.17 वाजता ग्रहण परमोच्च बिंदूवर पोहोचेल.

भारतात सूतक काळ लागू होईल का?

धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यग्रहण सुरू होण्याच्या ठीक 12 तास आधी सूतक काळ सुरू होतो. या काळात शुभ आणि पवित्र कार्य टाळले जातात. मंदिरांचेही दरवाजे बंद ठेवले जातात. परंतु हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे भारतात सूतक काळ लागू होणार नाही. त्यामुळे कोणतेही धार्मिक नियम पाळण्याची किंवा सूतक काळाचं पालन करण्याची आवश्यकता नाही. मंदिरे आणि दैनंदिन पूजा नेहमीप्रमाणे सुरू राहतील.

हे सूर्यग्रहण महत्त्वाचं का आहे?

जरी हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसलं तरी ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या हालचालींचा सर्व राशींवर आणि निसर्गावर अप्रत्यक्ष परिणाम होतो. प्राचीन मान्यतेनुसार, भारतात ग्रहण दिसत नसलं तरी गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या काळात भगवान शिव किंवा त्यांच्या इष्ट देवतेच्या मंत्रांचा जप करावा. तर ग्रहण संपल्यानंतर गहू, गूळ, तांब्याची भांडी किंवा लाल कपड्यांचं दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us