पाकचा माजी क्रिकेटपटू अब्दुल्ल रझाकचे भारतीय क्रिकेट संघावर गंभीर आरोप

| Updated on: Jun 04, 2020 | 4:46 PM

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाक याने भारतीय संघावर गंभीर आरोप केले आहेत (Abdul Razzaq allegation on Indian team).

पाकचा माजी क्रिकेटपटू अब्दुल्ल रझाकचे भारतीय क्रिकेट संघावर गंभीर आरोप
Follow us on

लाहोर : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाक याने भारतीय संघावर गंभीर आरोप केले आहेत (Abdul Razzaq allegation on Indian team). “गेल्या वर्षीच्या विश्वचषकात भारताने इंग्लंडविरोधात खेळताना जाणूनबुजून पराभव स्वीकारला होता”, असा आरोप अब्दुल रझाकने पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे (Abdul Razzaq allegation on Indian team).

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने आपल्या ‘ऑन फायर’ या आत्मचरित्रातदेखील भारताविरोधात झालेल्या सामन्याबाबत लिहिलं आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची फलंदाजी हवी तशी पाहायला मिळाली नव्हती, असं स्टोक्सने आपल्या पुस्तकात म्हटल्याचा दावा अब्दुल रझाकने केला.

“आम्ही भारत आणि इंग्लंडचा तो सामना बघितला. कोणताही संघ जर दुसऱ्या संघाला पुढच्या फेरीसाठी पात्र होण्यापासून रोखण्यासाठी जाणीवपूर्वक पराभूत होत असेल तर बीसीसीआयने त्या संघाला दंड आकारावा. एखादा चांगला गोलंदाज आपल्या क्षमतेनुसार गोलंदाजी करत नसेल तर ते लगेच लक्षात येतं. भारतीय संघ जाणीवपूर्वक तो सामना हरला. मी त्यावेळीदेखील तेच सांगितलं होतं, याशिवाय प्रत्येक क्रिकेटरला तेच वाटलं होतं”, असा घणाघात रझाकने केला.

अब्दुल रझाकच्या आधी पाकिस्तानचे माजी खेळाडू सिकंदर बख्त आणि मुश्ताक अहमद यांनीदेखील भारतीय संघावर अशाप्रकारचे आरोप केले आहेत. “बेन स्टोक्सने आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की, भारतीय संघ इंग्लंड विरोधात खेळताना जाणूनबुजून हरला जेणेकरुन पाकिस्तानचा संघ विश्वचषकातून बाहेर पडेल”, असं ट्विट सिकंदर बख्तने केलं होतं.

दरम्यान, बेन स्टोक्सने सिकंदर बख्तच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. “बख्त यांनी केलेला दावा माझ्या पुस्तकात सापडणार नाही. भारतीय संघ आमच्याविरोधात जाणीवपूर्वक हारला, असं मी पुस्तकात कुठेही म्हटलेलं नाही”, असं बेन स्टोक्सने स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा : ट्विटरवर #युवराज_सिंह_माफी_मांगो का ट्रेंड होतंय?