एबीडी परत येतोय, IPL 2023 मध्ये पुन्हा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये दिसणार

| Updated on: May 24, 2022 | 1:53 PM

एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) मागच्यावर्षी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगच्या सीजनमध्ये (IPL) तो दिसला नाही.

एबीडी परत येतोय, IPL 2023 मध्ये पुन्हा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये दिसणार
AB de Villiers
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई: एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) मागच्यावर्षी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगच्या सीजनमध्ये (IPL) तो दिसला नाही. अलीकडेच त्याने दिलेल्या योगदानाबद्दल रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (Royal challengers Banglore) त्याचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला. दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स 2011 पासून RCB च्या संघाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याने अनेक सामने बँगलोरला एकहाती जिंकून दिलेत. डिव्हिलियर्सशी खास नातं असणाऱ्या विराट कोहलीने RCB कॅम्पमध्ये डिव्हिलियर्सची उणीव जाणवत असल्याचं सांगितलं होतं. अलीकडेच एक शो मध्ये विराट कोहलीने त्याचा जवळचा मित्र एबी डिव्हिलियर्स आरसीबीमध्ये दिसेल, असे संकेत दिले होते. पण प्लेयरच्या रोलमध्ये तो नसणार हे देखील स्पष्ट आहे.

अजून काही ठरलेलं नाही

पुढच्यावर्षी आरसीबीच्या सेटअपचा भाग असणार, याला एबी डिव्हिलियर्सने स्वत: दुजोरा दिला आहे. पण तो कुठल्या रोलमध्ये असणार, या बद्दल स्पष्टता नाहीय. मला भरभरुन प्रेम करणाऱ्या आरसीबीच्या चाहत्यांची उणीव जाणवली, असं डिव्हिलियर्सने सांगितलं. पुढच्या सीजनपासून प्रत्येक फ्रेंचायजीच्या होम ग्राऊंडवर आयपीएलचे सामने होतील. “अजून काही ठरलेलं नाही. पुढच्यावर्षी तुम्ही मला आयपीएलमध्ये नक्कीच पाहू शकता. माझा रोल काय असेल, या बद्दल मी आता सांगू शकत नाही. पण मी आयपीएल मिस करतोय” असं एबी डिव्हिलियर्सने व्हीयू स्पोर्टशी बोलताना सांगितलं.

हे सुद्धा वाचा

मला माझ्या दुसऱ्या घरी यायला आवडेल

“आयपीएल सामने पुन्हा बँगलोरमध्ये होणार असल्याचं मी ऐकलं आहे. मला माझ्या दुसऱ्या घरी यायला, प्रेक्षकांनी खच्चून भरलेलं चिन्नास्वामी स्टेडियम बघायला आवडेल नक्कीच आवडेल” असं डिव्हिलियर्सने सांगितलं. बँगलोरची टीम आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचली आहे. उद्या त्यांचा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध होणार आहे. हा एलिमिनेटरचा सामना असेल. म्हणजे हरणाऱ्या संघाचं आव्हान संपुष्टात येईल.