IPL 2026: बीसीसीआयने DRSचा नियम बदलला, इतकंच काय तर संघांची चलाखी देखील होणार बंद!
आयपीएल 2026 स्पर्धेतील डीआरएस नियमात एक मोठा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी अपील केलं की डीआरचा पूर्ण वापर व्हायचा. आता तसं शक्य नाही. कारण बीसीसीआयने त्यासाठी नियम तयार केला आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेतील दोन सामने पार पडले असून तिसरा सामन्याची तयारी सुरू आहे. असं असताना काही नियमांबाबत या स्पर्धेपूर्वी सांगण्यात आलं होतं. पण आता स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यातील महत्त्वाचा बदल डीआरएसबाबत घेण्यात आला आहे. त्यामुळे संघांची अपील केल्यानंतर होणारी चालाखी टाळता येणार आहे. यापू्र्वीच्या पर्वात असं निदर्शनास आलं होतं. पण बीसीसीआयने या नियमात बदल करून चालाखीला चाप लावला आहे. आता डीआरएसची अपील ज्या निर्णयासाठी झाली तो निर्णय तपासला जाईल. यापूर्वी असं होत नव्हतं. तिसरा पंच निकाल देण्यापूर्वी सर्व बाजू तपासत होता. क्रिकबझच्या वृत्तानुसार, नवीन पर्व सुरू होण्यापूर्वी झालेल्या एका बैठकीत सर्व 10 कर्णधारांना या बदलाची माहिती देण्यात आली होती. नेमका बदल काय ते सविस्तर जाणून घेऊयात.
आयपीएल 2025 अर्थात मागच्या पर्वापर्यंत कर्णधार एखाद्या निर्णयासाठी डीआरएस घ्यायचा. त्यावेळी पंच सर्वच बाबी तपासून पाहायचे. जसं की झेलबाबत मैदानी नॉट आऊट दिलं आणि डीआरएस घेतला. त्यावेळी बॅटला बॉल लागला की नाही हे तपासताना वाईड बॉलही तपासला जायचा. पण आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने झेलसाठी अपील केलं असेल तर टीव्ही पंच फक्त तेवढंच तपासणार आहे. जर फलंदाजाला वाटलं की बॅटला चेंडू घासला नाही तर तो वाइडसाठी अपील करू शकतो. याबाबतीत त्याला अपील सुरूवातीच्या 15 सेकंदात करावं लागेल. टीव्ही पंचांनी निर्णय दिल्यानंतर दुसऱ्या अपीलसाठी अतिरिक्त 15 सेकंद मिळणार नाहीत.
डोक्याला दुखापत झाल्यास काय?
एखाद्या खेळाडूच्या डोक्याला दुखापत झाली तर बदली खेळाडू द्यायचा की नाही याबाबत निर्णय घेतला गेला. एखाद्या खेळाडूला बदलण्याची गरज भासल्यास, संघात त्याच्यासारख्याच दुसऱ्या खेळाडूचा समावेश केला जाईल. पण निवड ‘इम्पॅक्ट सब्स्टिट्यूट्स’ म्हणून निवडलेल्या त्याच पाच खेळाडूंमधून केली जाईल. यष्टीरक्षकाला बदलण्याची गरज भासल्यास, सामन्यासाठी निवडलेल्या संघातील एखाद्या खेळाडूवर जबाबदारी सोपवली जाईल. विदेशी खेळाडूला दुखापत झाल्यास संघातील प्लेइंग 11 मध्ये 3 विदेशी खेळाडू असल्यास त्याला जागा मिळेल. अन्यथा भारतीय खेळाडू मैदानात येईल.