
शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या थरारक आणि सनसनाटी सामन्यात यजमान इंग्लंड वूमन्सने बाजी मारत टी 20i मालिकेचा शेवट गोड केला आहे. पाचव्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियावर 5 विकेट्सने मात केली आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 168 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 6 धावांची गरज होती. टीम इंडियाकडून अरुंधती रेड्डी हीने ओव्हर टाकली. अरुंधतीने 20 व्या ओव्हरमधील पहिल्या 5 बॉलमध्ये 5 धावा दिल्या. सामन्यात बरोबरी झाली होती. त्यामुळे इंग्लंडला विजयसाठी शेवटच्या चेंडूवर 1 धावेची गरज होती.
इंग्लंडकडून सोफी एकलेस्टोन ही शेवटच्या बॉलवर स्ट्राईकवर होती. आता शेवटच्या चेंडूवर कोण जिंकणार? हे स्पष्ट होणार होतं. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची उत्कंठा वाढली होती. अरुंधती रेड्डी हीने यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. सोफी एकलेस्टोन हीने लेग स्टंपबाहेर जात फटका मारला आणि नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने धावत सुटली. तेव्हा स्मृती मंधाना हीने डायरेक्ट थ्रो केला. मात्र थ्रो थेट स्टंपवर बसला नाही. तसेच स्टंपजवळ टीम इंडियाचा एकही खेळाडू नव्हती. त्यामुळे रनआऊट करण्याची संधीही हुकली. अशाप्रकारे शेवटच्या चेंडूवर थरार रंगल्यानंतर अखेर इंग्लंड 1 धाव घेण्यात यशस्वी ठरली. इंग्लंडने यासह मालिकेतील दुसरा विजय मिळवला. मात्र त्यानंतरही टीम इंडियाने ही मालिका 3-2 अशा फरकाने आपल्या नावावर केली.
इंग्लंडसाठी सोफीने नाबाद 4 मात्र निर्णायक आणि विजयी खेळी साकारली. तर Paige Scholfield हीने नाबाद 2 धावा करत सोफीची चांगली साथ दिली. इंग्लंडसाठी डॅनिएल व्याट-हॉज हीने सर्वाधिक 56 धावा केल्या. सोफी डंकले हीने 46 धावांचं योगदान दिलं. कर्णधार टॅमी ब्यूमोंटने 30 रन्स केल्या. माईया बाउचेने 16 तर एमी जोन्सने 10 रन्स केल्या. तर टीम इंडियाकडून दीप्ती शर्मा आणि अरुंधती रेड्डी या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर राधा यादव हीने 1 विकेट मिळवली. भारतीय गोलंदाजांनी या धावसंख्येचा शेवटच्या दुसऱ्या चेंडूपर्यंत यशस्वी बचाव केला. मात्र शेवटच्या चेंडूवर इंग्लंडने बाजी मारली.
इंग्लंडने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मात्र शफाली वर्मा हीचा अपवाद वगळता टीम इंडियाच्या प्रमुख फलंदाजांनी निराशा केली.
What A Match
WHAT A FINISH! 😅 pic.twitter.com/kGbw17su4h
— England Cricket (@englandcricket) July 12, 2025
स्मृती मंधाना, जेमीमाह रॉड्रिग्स, हर्लीन देओल आणि दीप्ती शर्मा या चौघींना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. भारतासाठी ओपनर शफाली वर्मा हीने सर्वाधक 75 धावांचं योगदान दिलं. रिचा घोष हीने 24 तर कर्णधार हरमनप्रीत कौर हीने 15 धावा जोडल्या. तर अखेरच्या काही षटकांत राधा यादव आणि अरुंधती रेड्डी या जोडीने केलेल्या नाबाद भागीदारीमुळे टीम इंडियाला 150 पार मजल मारता आली. राधाने 14 तर अरुंधतीने 9 धावा केल्या. इंग्लंडसाठी चार्ली डीन हे 3 विकेट्स मिळवल्या. सोफी एकलेस्टोन हीने तिघींना बाद केलं. तर इतर दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.