खड्ड्यात जाऊदे बिर्याणी…, टीम इंडियाच्या खेळाडूचा पारा चढला, रवी शास्त्रींनी सर्वच सांगितलं

Ravi Shastri On Biryani : टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. शास्त्री कॉमेंट्री पॅनेलचे सदस्य आहेत. शास्त्रींनी या दरम्यान टीम इंडियातील एका वेगवान गोलंदाजाचा किस्सा सांगितला आहे. जाणून घ्या.

खड्ड्यात जाऊदे बिर्याणी..., टीम इंडियाच्या खेळाडूचा पारा चढला, रवी शास्त्रींनी सर्वच सांगितलं
Team India Former Coach Ravi Shastri
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 18, 2025 | 3:42 PM

टीम इंडिया शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जोरदार तयारी करत आहे. टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यची सुरुवात 20 जूनपासून होत आहे. टीम इंडियाने या सामन्याआधी जोरदार सराव केला आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी माजी बॉलिंग कोच भरत अरुणसह इनसाईड स्टोरी सांगितली आहे. मोहम्मद शमीला बिर्याणी खाण्यापासून रोखल्याने टीम इंडिया कशी जिंकली होती, हा किस्सा शास्त्रींनी सांगितला आहे. हा किस्सा 2018 साली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातील आहे. टीम इंडियाने तेव्हा जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेवर 63 धावांनी मात केली होती. टीम इंडियाने सामन्यातील चौथ्या दिवशी विजय मिळवला होता. मोहम्मद शमीला विजयाआधी बिर्याणी खाण्यापासून रोखलं होतं. रवी शास्त्री आणि भरत अरुण या दोघांनी काय काय सांगितलं? जाणून घेऊयात.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा शेवटचा सामना होता. दक्षिण आफ्रिकेने पहिले 2 सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली होती. जोहान्सबर्ग टेस्टमधील चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला 223 धावांची गरज होती. तर दक्षिण आफ्रिकेच्या हातात 8 विकेट्स होत्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेकडे विजयी हॅटट्रिकची संधी होती. तर टीम इंडियासमोर व्हाईटवॉश टाळण्याचं आव्हान होतं. दक्षिण आफ्रिकेला लंचनंतर  विजयासाठी 171 धावा पाहिजे होत्या. तर 7 विकेट्स हातात होत्या.

रवी शास्त्री यांनी सोनी स्पोर्ट्स सोबत बोलताना शमीच्या ताटातील ढीगभर बिर्याणीचा किस्सा सांगितला. रवी शास्त्री शमीच्या जवळून जात होते. तेव्हा शास्त्रींनी शमीच्या ताटात ढीगभर बिर्याणी पाहिली.

शमीचा संताप आणि टीम इंडियाचा विजय

“हा जोहान्सबर्गमधील सामन्याचा शेवटचा सामना होता. सामना रंगतदार स्थितीत होता. दक्षिण आफ्रिकेला 240 धावांची गरज होती. ते विजयापासून 100 धावा दूर होते. त्यांच्या हातात 8 विकेट्स होत्या. दुपारची वेळ होती. मी शमीच्या जवळून जात होतो. पाहतो तर काय, शमीच्या ताटाच ही बिर्याणी होती”, असं शास्त्रींनी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कसोबत बोलताना म्हटलं.

“इतकी बिर्याणी खाल्ल्यानंतर तुझी भूक शांत झाली का? असं शास्त्रींनी शमीला मस्करीत विचारलं होतं”,असा खुलासा भरत अरुण यांनी केला. शास्त्री जरी मस्करीत म्हणाले असले तरी शमी संतापला. त्यामुळे शमीने संतापात मला नकोय असं म्हणत बिर्याणीने भरलेलं ताट दूर सारलं.

“शमीला एकटं सोड. तुला शमीसोबत बोलायचं असेल तर त्याला इतकंच सांग की विकेट घे, असा सल्ला शास्त्रींनी मला दिला होता”, असं भरत अरुण यांनी सांगितलं. त्यानंतर शमीने भरत अरुणला म्हटलं, ” घे घे ताट घे. नकोय बिर्याणी, खड्ड्यात गेली बिर्याणी.”

त्यानंतर सामना संपला. शमीने शानदार कामगिरी केली. सामन्यानंतर काय झालं? याबाबत भरत अरुण सांगताना म्हणाले की, “मी शमीजवळ गेलो आणि त्याला म्हणालो की बिर्याणी घे, आता जेवढी हवी तेवढी खा”. टीम इंडियाचा हा वांडरर्स स्टेडियममधील दुसरा तर दक्षिण आफ्रिकेतील तिसरा विजय ठरला.

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा

दरम्यान मोहम्मद शमी पूर्णपणे फिट नसल्याने मोहम्मद शमीची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नाही. शमी टीममध्ये असता तर ताकद आणखी वाढली असती. मात्र शमी नसल्याने आता त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा आणि इतर गोलंदाज कशी कामगिरी करतात? हे पाहण्यासारखं असणार आहे.

Follow Us