IND vs BAN : उपकर्णधार शुबमन गिलची शतकी खेळी, टीम इंडियाची विजयी सलामी, बांगलादेशचा 6 विकेट्सने धुव्वा

CT 2025 India vs Bangladesh Match Result And Highlights : शुबमन गिल याने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये शानदार शतक झळकावत टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध विजय मिळवून दिला आहे.

IND vs BAN : उपकर्णधार शुबमन गिलची शतकी खेळी, टीम इंडियाची विजयी सलामी, बांगलादेशचा 6 विकेट्सने धुव्वा
shubman gill ind vs ban ct 2025
| Updated on: Feb 20, 2025 | 10:16 PM

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने बांगलादेशवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. बांगलादेशने टीम इंडियाला विजयासाठी 229 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 4 विकेट्स गमावून 46.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाने 231 धावा केल्या. उपकर्णधार शुबमन गिल हा विजयाचा शिल्पकार ठरला. शुबमन गिल याने शतकी खेळी केली. शुबमनने नाबाद धावा केल्या. तर केएल राहुल याने शुबमनला चांगली साथ देत टीम इंडियाला विजयापर्यंत पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

टीम इंडियाची बॅटिंग

कर्णधार रोहित आणि शुबमन या सलामी जोडीने टीम इंडियाला आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र रोहित 41 या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. टीम इंडियाने 69 धावांवर पहिली विकेट गमावली. रोहितनंतर विराट मैदानात आला. विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. विराटला अपेक्षित सुरुवातही मिळाली. मात्र विराट क्रिकेट चाहत्यांना मोठी खेळी करुन दाखवण्यात अपयशी ठरला. विराट 38 बॉलमध्ये 22 रन्स करुन आऊट झाला. विराटनंतर भारताने ठराविक अंतराने 2 विकेट्स गमावले. श्रेयस अय्यर 15 आणि अक्षर पटेल 8 धावा करुन माघारी परतले. त्यामुळे टीम इंडियाची 30.1 ओव्हरमध्ये 4 आऊट 144 अशी स्थिती झाली. टीम इंडिया काहीशी अडचणीत सापडली होती. मात्र तिथून शुबमन आणि केएल राहुल या दोघांनी डाव सावरला आणि भारताला विजयी केलं.

शुबमन आणि केएल या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 87 धावांची नाबाद आणि विजयी भागीदारी केली. शुबमनने 129 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 9 फोरसह नॉट आऊट 101 रन्स केल्या. तर केएलने 47 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 41 धावा केल्या. बांगलादेशकडून रिषाद हौसेन याने 2 विकेट्क घेतल्या. तर तास्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

बांगलादेशची बॅटिंग

दरम्यान त्याआधी बांगलादेशने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र बांगलादेशला टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. मात्र तॉहिद हृदॉय याचं शतक आणि जाकेर अली याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशने 49.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट 228 धावा केल्या. तॉहिदने 118 बॉलमध्ये 100 रन्स केल्या. तर जाकेर अलीने 114 चेंडूत 68 धावा केल्या. या दोघांनी चिवट खेळी करत बांगलादेशची लाज राखली. मात्र इतर फलंदाजांनी भारतीय गोलंदाजंसमोर गुडघे टेकले. टीम इंडियाकडून मोहम्मद शमी याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. हर्षित राणा याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अक्षर पटेल याने 2 विकेट्स मिळवल्या.

रोहितसेनेची विजयी सुरुवात, उपकर्णधार शुबमनचा शतकी झंझावात

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तांझीद हसन, सौम्या सरकार, तॉहिद हृदॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, जाकेर अली, रिशाद हुसेन, तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान.