
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यांचा थरार अवघ्या काही तासांवर असताना इंडिया ए टीमने धमाका केलाय. आयुष बडोनी याच्या नेतृत्वात इंडिया ए टीमने वर्ल्ड कप स्पर्धेच्या सराव सामन्यात नामिबियावर जबरदस्त आणि एकतर्फी असा विजय मिळवला आहे. इंडिया ए टीमने बंगळुरुत बीसीसीआय सीओई मैदानात नामिबियासमोर 198 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी नामिबियाला 12.1 ओव्हरमध्ये 67 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने यासह नामिबायचा 130 धावांनी धुव्वा उडवला.
भारताने नामिबियाचं 73 बॉलमध्ये पॅकअप केलं. भारतीय गोलंदाजांसमोर नामिबियाच्या फक्त 2 फलंदाजांनाच दुहेरी आकडा गाठता आला. डिलन लीचर याने 22 धावा केल्या. जान फ्रायलिंक याने 12 धावांचं योगदान दिलं. तर इतर फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर लोंटागण घातलं. भारताच्या गोलंदाजांनी नामिबियाच्या तिघांना आले तसेच त्यांना झिरोवर आऊट करत मैदानाबाहेर पाठवलं. तर 6 फलंदाजांचं दुहेरी आकड्याआधीच पॅकअप केलं.
भारतासाठी गुरजनप्रीत सिंह, मयंक यादव, अशोक शर्मा आणि विपराज निगम या चौघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर कॅप्टन आयुष बडोनी आणि रवी बिश्नोई या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
त्याआधी भारताने नाणेफेक जिंकली. कॅप्टन आयुष बडोनी याने बॅटिंगचा निर्णय घेतला. भारताच्या सलामी जोडीने निराशा केली. प्रियांश आर्या 5 आणि उर्विल पटेल याने 14 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यानंतर नमन धीर आणि रियान पराग या जोडीने नामिबियाची धुलाई केली. नमनने 29 बॉलमध्ये 39 रन्स केल्या. तर रियानने सर्वाधिक धावा केल्या.
रियानने 39 चेंडूत 6 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 69 धावांचं योगदान दिलं. तसेच आशुतोष शर्मा याने 35 धावा जोडल्या. तर इतरांना तुलनेत कमजोर असलेल्या नामिबियासमोर काही खास करता आलं नाही. नामिबियासाठी तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर दोघांनी 1-1 विकेट मिळवली.
दरम्यान इंडिया ए टीमने पहिल्या प्रॅक्टीस मॅचमध्ये यूएसएचा पराभव केला होता. उभयसंघातील सामन्याचं 2 फेब्रुवारीला नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये आयोजन करण्यात आलं होतं. भारताने हा सामना हा 38 धावांनी जिंकला होता.