Video : कॅच सोडला की वाचला! हॅरी ब्रकूने मारला जोरदार फटका, शुबमन गिलने प्रयत्न केला पण…

भारत आणि इंग्लंड या सामन्यात पुन्हा एकदा इंग्लंडचे फलंदाज टीम इंडियावर भारी पडले. 587 धावांचा डोंगर आणि 5 विकेट झटपट घेऊनही ब्रूक आणि स्मिथ जोडी डोकेदुखी ठरली. या दरम्यान झेल घेण्याच्या प्रयत्नात शुबमन गिलच्या कपाळावर जोरात चेंडू लागला.

Video : कॅच सोडला की वाचला! हॅरी ब्रकूने मारला जोरदार फटका, शुबमन गिलने प्रयत्न केला पण...
कॅच सोडला की वाचला! हॅरी ब्रकूने मारला जोरदार फटका, शुबमन गिलने प्रयत्न केला पण...
Image Credit source: video grab
| Updated on: Jul 04, 2025 | 6:42 PM

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेत हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ या जोडीने जबरदस्त कमबॅक केलं. सहाव्या विकेटसाठी या जोडीने दमदार खेळी केली. 84 धावांवर 5 गडी बाद अशी स्थिती होती. या दोघांनी 200 हून अधिक धावांची भागीदारी केली. यामुळे भारताचं फॉलोऑन देण्याचं स्वप्न भंगणार असंच दिसत आहे. दोघांनी शतकी खेळी केल्याने इंग्लंडने डाव सावरला असंच म्हणावं लागेल. खरं तर ब्रूकची विकेट मिळायला हवी होती. पण त्याचा झेल सुटल्याने त्याने शतक ठोकलं. जडेजाच्या गोलंदाजीवर गिलने विकेट घेण्याची संधी गमावली. रवींद्र जडेजाने डावातील 37वे षटक टाकले. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ब्रूकने कट शॉट खेळला. पण चेंडू बॅटच्या काठावर आदळला आणि स्लिपवर उभ्या असलेल्या गिलकडे गेला. पण चेंडू इतक्या वेगाने गिलकडे आला की त्याचा अंदाज लावता आला नाही. गिलने त्याच्या डोक्याकडे येणारा चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्याला अपयश आलं. गिलच्या हातातून निसटलेला चेंडू थेट त्याच्या डोक्याच्या डाव्या बाजूला लागला.

चेंडू डोक्यावर जोरात आदळल्याने शुबमन गिलला वेदना होऊ लागल्या. सुदैवाने, चेंडू गिलच्या डाव्या डोळ्याच्या अगदी एक किंवा दीड इंच वर लागला. जर हा चेंडू गिलच्या डोळ्याला लागला असता तर परिस्थिती काही वेगळी असती. गिलची कारकीर्द धोक्यात आली असती. गिलला दुखापत होताच संघाचे फिजिओ ताबडतोब मैदानात आले आणि गिलची तपासणी केली. पण व्यवस्थित असल्याचं कळताच सर्वांना सुटकेचा निश्वास सोडला.

हॅरी ब्रूकचा झेल सोडला तेव्हा तो 63 धावांवर खेळत होता. मात्र त्याने या संधीचं सोन केलं आणि आक्रमक खेळ सुरुच ठेवला. खऱ्या अर्थाने भारताच्या गोलंदाजीची पिसं निघताना दिसत आहे. भारताकडे इंग्लंडच्या फलंदाजांना रोखण्याचं कोणतंच उत्तर दिसत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भारत सहज जिंकेल असं वाटणारा सामना आता बरोबरीवर आला आहे. भारताने 587 धावा केल्या म्हणून ठीक आहे. अन्यथा इंग्लंडच्या फलंदाजांना रोखणं खूपच कठीण झालं असतं.