IND vs ENG : रोहितचं अर्धशतक, पुजारा शतकाच्या उंबरठ्यावर, दुसऱ्या डावात भारताची 2 बाद 215 धावांपर्यंत मजल

| Updated on: Aug 27, 2021 | 11:15 PM

आजच्या दिवसाची सुरुवात भारतीय गोलंदाजांनी चांगली केली. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये इंग्लंडचे उर्वरीत फलंदाज बाद करुन इंग्लंडचा डाव 432 धावांवर संपवला.

IND vs ENG : रोहितचं अर्धशतक, पुजारा शतकाच्या उंबरठ्यावर, दुसऱ्या डावात भारताची 2 बाद 215 धावांपर्यंत मजल
Follow us on

हेडिंग्ले : तिसऱ्या कसोटीमध्ये प्रथम भारताला 78 धावांमध्ये ऑल आऊट केल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या दिवसअखेर 8 बाद 423 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर आज इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी त्यात 9 धावांचं योगदान दिलं आणि इंग्लंडचा पहिला डाव 432 धावांमध्ये संपुष्टात आला. त्यानंतर दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी चांगली फलंदाजी करत आजचा दिवस आपल्या नावे केला आहे. भारताने तिसऱ्या दिवसअखेर 80 षटकात 2 गड्यांच्या बदल्यात 215 धावांपर्यंत मजल मारली आहे. चेतेश्वर पुजारा 91 तर कर्णधार विराट कोहली 45 धावांवर नाबाद खेळत आहेत. (Ind vs Eng 3rd Test : Rohit’s Fifty, Pujara on way to hit century, India’s 215 for 2 in the second innings)

आजच्या दिवसाची सुरुवात भारतीय गोलंदाजांनी चांगली केली. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये इंग्लंडचे उर्वरीत फलंदाज बाद करुन इंग्लंडचा डाव 432 धावांवर संपवला. भारताकडून या डावात मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 बळी घेतले. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जाडेजा या तिघांनी प्रत्येकी 2 बळी घेत इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला. त्यानंतर दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात बरी झाली नाही. 19 व्या षटकात संघ 34 धावांवर असताना लोकेश राहुल (8) बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा (59) आणि चेतेश्वर पुजाराने 82 धावांची भागीदारी केली. रोहितला रॉबिन्सनने पायचित केलं. त्यानंतर पुजारा आणि विराट कोहली या जोडीने अखेरपर्यंत चिवट फलंदाजी केली. दोघांनी 196 चेंडूत नाबाद 99 धावांची भागीदारी केली आहे. पुजारा 91 धावांवर खेळत आहे. तर विराट 45 धावांवर नाबाद आहे.

त्या अगोदर पहिल्या दिवशी इंग्लंडने बिनबाद 120 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगलेच धुतले. कर्णधार जो रुटच्या शतकी (121) खेळीच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या दिवसअखेर 8 बाद 423 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे इंग्लंडला 345 धावांची आघाडी मिळाली होती. आज 2 विकेट हातात घेऊन इंग्लंडने 423 धावांपुढे खेळण्यास सुरुवात केली. ज्यानंतर केवळ 9 धावा केल्यानंतर भारताडून शमी आणि बुमराहने एक एक विकेट घेत 432 धावांवर इंग्लंडचा पहिला डाव संपवला.

भारताचा पहिला डाव

नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतलेल्या भारतीय संघासाठी तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस अतिशय खराब ठरला होता. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण कर्णधार विराट कोहली याचा हाच निर्णय चुकीचा ठरताना दिसला. कारण प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय फलंदाजांची सुरुवातच खराब झाली. इंग्लंडच्या गोलंदाजांच्या माऱ्यापुढे भारतीय फलंदाज फार काळ तग धरु शकले नाहीत. टीम इंडियाचे सर्व फलंदाज अवघ्या 78 धावांवर तंबूत परतले. भारतीय संघाकडून रोहित शर्मा याने सर्वाधिक 19 धावा केल्या. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग आव्हर्टन यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर ऑली रॉबिन्सन आणि सॅम करन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

इंग्लंडकडे अद्याप 139 धावांची आघाडी

तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 432 धावांवर समाप्त झाला. त्यामुळे इंग्लंडला भारतावर 354 धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने 215 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे भारत अजूनही 139 धावांनी पिछाडीवर आहे.

हे ही वाचा

Lionel messi barcelona : 17 वर्षांचा प्रवास संपला, लिओनल मेस्सीचा बार्सिलोना संघाला रामराम!

दहाव्या वर्षी उपचारासाठी मदत, 20 वर्षांपासून तोच संघ, कोट्यवधींच्या ऑफर्स धुडकावल्या

ख्रिस्तियानो रोनाल्डोची घरवापसी, Juventus सोडून जुन्या क्लबमध्ये परतला

(Ind vs Eng 3rd Test : Rohit’s Fifty, Pujara on way to hit century, India’s 215 for 2 in the second innings)