मुंबई: जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) इंग्लंड विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात नशिबाने कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली. टेस्ट कॅप्टन म्हणून त्याचा डेब्यु यशस्वी होऊ शकला नाही. कारण एजबॅस्टन कसोटीत (edgbaston test) भारताचा पराभव झाला. कॅप्टन (India Captain) म्हणून बुमराह त्याच्या रणनिती मध्ये थोडा कमी पडला असेल. पण त्याने त्याच्या कामगिरीने मात्र सर्वांच लक्ष वेधून घेतलं. त्यासाठी त्याचं कौतुकही झालं. पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना त्याने 16 चेंडूत 31 धावा फटकावल्या. त्याशिवाय तीन विकेटही काढले. दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांमध्ये फक्त जसप्रीत बुमराहलाच दोन विकेट काढता आले. त्याने अशा टप्प्यावर विकेट काढले की, थोडी विजयाची अंधुकशी आशाही निर्माण झाली होती. पण भारताचा पराभव झाला. कर्णधारपद भुषवताना त्या खेळाडूला स्वत:च्या कामगिरीतून संघासमोर आदर्श घालून द्यायचा असतो. बुमराह त्यात यशस्वी ठरला. पण रणनिती मध्ये त्याला अजून काही गोष्टी शिकून घ्याव्या लागतील.
प्रथमच कर्णधारपद भुषवणाऱ्या बुमराहला सामन्यानंतर तुला दीर्घकाळ टीम इंडियाचं कर्णधारपद भुषवायला आवडेल का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्याने, “ते मी ठरवू शकत नाही. देशाचं नेतृत्व करायची संधी मिळणं हा सन्मान आहे आणि आव्हानं मला आवडतात” असं बुमराह म्हणाला.
“कर्णधार म्हणून भविष्य मी ठरवू शकत नाही. मला जबाबदाऱ्या आवडतात. हे एक चांगलं चॅलेंज होतं. संघाचं नेतृत्व करायला मिळणं ही अभिमानास्पद बाब आहे. हा एक चांगला अनुभव होता” असं बुमराह म्हणाला. पाचव्या कसोटीत इंग्लंडकडून झालेल्या पराभवाबद्दल बोलताना, हेच कसोटी क्रिकेटच सौंदर्य असल्याचं त्याने सांगितलं. “तीन दिवस भारतीय संघ सरस होता, तरीही पराभव झाला” असं बुमराह म्हणाला. “दुसऱ्याडावात जास्त धावा झाल्या नाहीत, ते महाग पडलं” असं बुमराह म्हणाला. निकाल योग्य आहे. त्याने इंग्लंडच्या संघाचं कौतुक केलं.
मालिकेतील पाचवी अखेरची कसोटी जिंकून इंग्लंडने मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. भारताने इंग्लंडला विजयासाठी 378 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पहिल्या डावातील भारतीय गोलंदाजांची कामगिरी पाहता, दुसऱ्याडावात ते इंग्लंडला विजयाच्या जवळपासही पोहोचू देणार नाही, असं वाटलं होतं. पण भारतीय संघाचा दारुण पराभव झाला आहे.