
मुंबई : भारताने आयर्लंड दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. शुक्रवारी डब्लिन येथे खेळलेल्या पहिल्या सामन्यात भारताने 2 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता दुसरा टी20 सामना जिंकताच मालिका भारताच्या खिशात जाणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या दुसऱ्या सामन्याकडे नजरा लागून आहेत. कोणत्या खेळाडूंसह टीम इंडिया मैदानात उतरेल आणि कोणते खेळाडू मैदान गाजवतील याबाबत अंदाज बांधला जात आहे. विशेष म्हणजे तिनही सामने डब्लिन मैदानातच होणार आहेत. त्यामुळे खेळपट्टी आपलं वेगळं स्वरूप दाखवू शकते. त्याचा फायदा आणि तोटा दोन्ही संघांना बसू शकतो. त्यामुळे खेळपट्टीचा अंदाज घेऊन कर्णधार खेळाडूंची निवड करतील यात काही शंका नाही.
तीन सामन्यांची टी20 मालिका एकाच मैदानावर आहे. त्यामुळे दिवसागणित त्यात काही बदल घडतील यात शंका नाही. सुरुवातील फलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी गोलंदाजांच्या बाजूने झुकू शकते. कारण थंड वातावरण आणि पाऊस झाल्याने खेळपट्टीवर फलंदाजी करणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणं कर्णधार पसंत करतील. वेगवान गोलंदाजांसोबत फिरकीपटू हे मैदाना गाजवतील. धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांची विजयी टक्केवारी 60 टक्के आहे. त्यामुळे धावांचा डोंगर आणि फटकेबाजी यावर गणितं बदलून जातील यात शंका नाही.
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणं तसं कठीण आहे. कारण निवडलेल्या खेळाडूंना अपेक्षित कामगिरी करण्याची संधी तशी मिळालेली नाही. त्यामुळे त्याच प्लेइंग 11 सह जसप्रीत बुमराह मैदानात उतरेल. तीन वेगवान गोलंदाज आणि 2 स्पिनर्ससह संघ खेळेल.
यशस्वी जयस्वाल आणि जसप्रीत बुमराह या सामन्यात चांगली कामगिरी करतील अशी दाट शक्यता आहे. कर्णधार म्हणून याची निवड फायद्याची ठरू शकते. पण सामन्यात कधीही काहीही होऊ शकतं. पण त्यातल्या त्यात हे खेळाडू प्रभावी कर्णधार ठरू शकतात. त्याचबरोबर हॅरी टेक्टर, ऋतुराज गायकवाड यांना संघातील स्थान गुणांच्या दृष्टीकोनातून चांगले ठरतील असा अंदाज वर्तवला जात आहे. जॉर्ज डॉकरेल, वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडूही सामना कधीही फिरवू शकतात.