
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी 20I सामना हा कटकमधील बाराबती स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना मंगळवारी 9 डिसेंबरला होणार आहे. ओडीसातील बाराबती स्टेडियम भारतीय क्रिकेटच्या सुवर्ण क्षणाचा साक्षीदार राहिला आहे. बाराबती ऐतिहासिक असं स्टेडियममध्ये आहे. याच स्टेडियममध्ये माजी ऑलराउंड कपिल देव यांनी 300 कसोटी विकेट्स पूर्ण केल्या होत्या. मात्र आता बाराबती स्टेडियमची दुरावस्था झाली आहे. बाराबती स्टेडियममध्ये किमान सुविधांची बोंब आहे. त्यामुळे पहिल्या टी 20 सामन्याआधीच या स्टेडियममध्ये नसलेल्या सुविधांची चर्चा रंगली आहे.
बाराबती स्टेडियममध्ये बैठक व्यवस्था ही चिंताजनक बाब आहे. या स्टेडियममध्ये आधुनिक आसन व्यवस्था नाही. त्यामुळे चाहत्यांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. तसेच प्रेस बॉक्सची स्थिती काही वेगळी नाही. माध्यमांचे प्रतिनिधी याच प्रेस बॉक्समधून सामन्याचं वृत्तांकन करतात. मोठे खांब आणि साईडस्क्रीनमुळे प्रेस बॉक्समधून मैदानातील दृष्य पाहण्यास अडचणींचा सामना करावा लागतो.
याच मैदानात फेब्रुवारी 2025 मध्ये टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकदिवसीय सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सामन्यादरम्यान फ्लडलाईट्स खराब झाल्याने खेळ थांबवावा लागला होता. तेव्हा 20 मिनिटांपेक्षा अधिक वेळ वाया गेला होता. तसेच या मैदानात मोजकेच संकटसमयी मार्ग (Emergency Exit) असल्याने क्रिकेट चाहत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे नको तसं घडलं तर काय? अशी भीती चाहत्यांना आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता या मैदानात संकटसमयी मार्गात वाढ करावी, अशी मागणी क्रिकेट चाहत्यांची आहे.
क्रिकेट चाहत्यांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तसेच शौचलयांमध्येही स्वच्छता नसते. स्टेडियममध्ये कधी कधी क्षमतेपेक्षा अधिक क्रिकेट चाहते येतात. त्यामुळे तो वेगळा त्रास सहन करावा लागतो. तिकीटांची चढ्या दरात विक्री हा कायमचाच मुद्दा राहिलाय.
दरम्यान ओसीए अर्थात ओडिशा क्रिकेट असोसिएशनवर बीसीसीआयकडून मिळालेल्या निधीचा वापर न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुविधांचा अभाव असल्याने या स्टेडियमला सामन्यांच्या आयोजनाचा मान मिळत नसल्याचा सूर पाहायला मिळत आहे.
बाराबती स्टेडियमच्या पुर्नबांधणीचा प्रस्ताव आहे. स्टेडियमची पुर्नबांधणी झाल्यास क्षमता 60 हजार इतकी होईल. त्यासाठी अंदाजे 600 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र आतापर्यंत या स्टेडियमध्ये कोणताही बदल झालेला नाही.