IND vs SA : केपटाऊनच्या खेळपट्टीबाबत आयसीसीने अखेर मौन सोडलं, दीड दिवसात सामना संपल्यानंतर असं केल गुणांकन

भारत दक्षिण अफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच पार पडली. ही मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली. भारताने दुसरा सामना जिंकत 13 वर्षानंतर दक्षिण अफ्रिकेत इतिहास रचला. पण हा सामना दीड दिवसातच संपल्याने खेळपट्टीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं.

IND vs SA : केपटाऊनच्या खेळपट्टीबाबत आयसीसीने अखेर मौन सोडलं,  दीड दिवसात सामना संपल्यानंतर असं केल गुणांकन
IND vs SA : केपटाऊनच्या खेळपट्टीबाबत आयसीसाने सहा दिवसानंतर दिला निकाल, रिपोर्टमध्ये स्पष्टच सांगितलं की...
| Updated on: Jan 09, 2024 | 5:35 PM

मुंबई : दक्षिण अफ्रिका दौऱ्यात टीम इंडियाने जबरदस्त कामगिरीचं प्रदर्शन केलं. पहिला कसोटी सामना गमवल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली. दुसरा कसोटी सामना भारताने अवघ्या दीड दिवसातच जिंकला. या सामन्यात धडाधड विकेट्स पडल्या होत्या. पहिल्याच दिवशी 23 विकेट्स पडल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 10 विकेट्स पडल्या. पाच दिवसांचा सामना अवघ्या दीड दिवसातच संपल्याने खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह तर उपस्थित होणारच ना. कर्णधार रोहित शर्मा यानेही भारताचा दाखला देत आयसीसीला कानपिचक्या दिल्या होत्या. भारतात असं काही झालं की आगडोंब उसळतो अशी टीका केली होती. अखेर सहा दिवसानंतर आयसीसीला उपरती झाली आहे. 107 षटकात सामना संपल होता आणि क्रिकेट इतिहासातील सर्वात छोटा सामना होता. कारण आतापर्यंत इतक्या कमी वेळेत कोणत्याच सामन्याचा निकाल झाला नव्हता. आता आयसीसीने पिच रेटिंग दिली आहे. आयसीसीने या खेळपट्टीला ‘असमाधानकारक’ असा शेरा दिला आहे.

आयसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉडने दक्षिण अफ्रिकेच्या खेळपट्टीबाबत आपला अहवाल सोपवला आहे. खेळपट्टीच्या मूल्यांकनानंतर न्यूलँडमधील खेळपट्टी असमाधानकारक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यांनी आपल्या अहवालात स्पष्टपणे सांगितलं आहे की, “न्यूलँडच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणं खरंच खूप कठीण होतं. चेंडू जबरदस्त उसळी घेत होतो. त्यामुळे शॉट्स खेळणं कठीण होतं. काही फलंदाजांच्या हँडग्लोव्ह्जला चेंडू लागला. उसळीचं प्रमाण अनिश्चित असल्याने झटपट विकेट्स गेल्या.”

खेळपट्टी आणि आऊटफिल्ड तपासणीत स्तर एकदम खराब असेल तर डिमेरिट गुण दिले जातात. जर एखाद्या पिचबाबत डिमेरिट गुण 6 पर्यंत गेल्यास त्या मैदानात वर्षभर कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळवता येत नाही. आता न्यूलँडच्या खेळपट्टीला 12 अवगुण देण्यात आले आहेत. त्यामुळे जवळपास दोन वर्षे या मैदानात सामना खेळवता येणार नाही. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेचे धाबे दणाणले आहेत. आता अपिल करण्यासाठी 14 दिवसांचा अवधी आहे.

2022 साली आयसीसीने भारताच्या एम चिन्नास्वामी मैदानाला सरासरीपेक्षा कमी गुण दिले होते. या मैदानावर पिंक टेस्टचं आयोजन करण्यात आलं होतं. या खेळपट्टीला आयसीसीने एक डिमेरिट पॉइंट दिला होता. तर आऊटफील्डवर नजर ठेवण्यास सांगितलं होतं.