IND VS SA Final : फायनल सामन्यात अर्शदीप सिंगकडे विक्रम रचण्याची संधी

ICC T20 world cup final : टीम इंडिया टी२० विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज आहे. भारतापुढे दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणारे. शेवटच्या सामन्यात भारताचा गोलंदाज अर्शदीप सिंग याच्याकडे देखील विक्रम मोडण्याची मोठी संधी आहे. तो या विक्रमापासून फक्त तीन विकेट दूर आहे.

IND VS SA Final : फायनल सामन्यात अर्शदीप सिंगकडे विक्रम रचण्याची संधी
ICC t20 world cup final
shailesh musale | Updated on: Jun 29, 2024 | 5:27 PM

आज रात्री 8 वाजता टी २० वर्ल्डकपचा अंतिम सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघामध्ये रंगणार आहे. या विश्वचषकात अनेक भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. त्यापैकीच एक भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग देखील आहे. ज्याला T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम करण्यापासून तो फक्त तीन विकेट्स दूर आहे. अर्शदीपने 7.50 च्या इकॉनॉमी रेटने आतापर्यंत 15 विकेट घेतल्या आहेत. 15 विकेट्ससह,तो सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे.

कोण आहे पहिल्या स्थानावर

अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू फजलहक फारुकी याने श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाचा स्पर्धेच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम मोडला. त्याने 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत 17 विकेट्स घेतल्या आहेत. फारुकी हा आता पहिल्या स्थानावर आहे. 20 षटकांच्या विश्वचषकाच्या 2021-22 हंगामात 16 विकेटसह हसरंगा दुसऱ्या स्थानावर आहे. अजंता मेंडिसने 2012-13 टी-20 विश्वचषकात 15 विकेट घेत तिसऱ्या स्थानावर आहे.

भारत वि. दक्षिण आफ्रिका सामना

बार्बाडोस येथे शनिवारी T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात रंगणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिक एकमेकांना भिडणार आहेत. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपासूनचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचे आव्हान भारतीय संघापुढे असेल. भारताने 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिलाच टी२० विश्वचषक जिंकला होता. आता भारताकडे पुन्हा एकदा संधी आहे.

दक्षिण आफ्रिका आणि भारत हे दोन्ही संघ 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेतील अपराजित संघ राहिले आहेत. दोघांनीही चमकदार कामगिरी केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वा भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि इंग्लंड या संघांना पराभूत केले आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने बांगलादेश आणि नेपाळवर फार कमी फरकाने विजय मिळवला. उपांत्य फेरीत त्यांनी अफगाणिस्तानचा पराभव केला आहे.

टीम इंडियात रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, बुमराह आणि कुलदीव यादव चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. या चौघांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. विराट कोहली आतापर्यंत खराब कामगिरी करत असला तरी शेवटच्या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. विराट कोहलीने अनेक सामन्यात भारताला पराभूत होण्यापासून वाचवले आहे.

Follow Us