
मुंबई: सध्या ब्रेक वर असलेला विराट कोहली (Virat kohli) आशिया कप (Asia Cup) स्पर्धेद्वारे पुनरागमन करणार आहे. पुनरागमनाबरोबर विराटच्या फॉर्मवरुनही चर्चा सुरु झाली आहे. टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री (Ravi shastri) यांच्या मते, विराट कोहलीला फॉर्म मध्ये परतण्यासाठी फक्त एका इनिंगची आवश्यकता आहे. जर, तो आशिया कपच्या पहिल्या सामन्यात म्हणजे पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक झळकावलं, तर त्याच्या फॉर्म वरुन सुरु असलेली चर्चाही संपुष्टात येईल. 28 ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध 5 आठवड्याच्या ब्रेकनंतर कोहली मैदानावर पुनरागमन करणार आहे.
माजी भारतीय कर्णधार विराट कोहली इंग्लंड दौऱ्यापासूनच ब्रेकवर आहे. वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात आली होती. “कोहली बरोबर अलीकडे माझी चर्चा झालेली नाही. पण तो योग्य वेळी फॉर्म मध्ये येतो. आशिया कप आधी खराब फॉर्म विराट कोहलीसाठी चांगला होता. त्यामुळे त्याला विचार करण्याची चांगली संधी मिळाली. कोहलीने पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक झळकावलं, तर लोकांची तोंड आपोआपच बंद होतील. एका इनिंग मुळे मोठा फरक पडू शकतो” स्टार स्पोर्ट्स वरील एका कार्यक्रमात रवी शास्त्री यांनी हे आपले विचार मांडले. “विराटला पुनरागमनासाठी फक्त एका इनिंगची गरज आहे. कारण त्याची भूक अजून कमी झालेली नाही. आधी काय झालं, हा इतिहास आहे” असं शास्त्री म्हणाले.
विराट कोहली मशीन आहे. जर त्याने त्याचं डोकं व्यवस्थित ठेवलं, तर पुनरागमनासाठी एक इनिंग पुरेशी आहे. कोहलीने आता कसून सराव केलाय. त्याआधी त्याने कुटुंबासोबत वेळ घालवला. या कॅलेंडर वर्षात कोहलीने सीरीज दरम्यान ब्रेक घेतले आहेत. शास्त्री म्हणाले की, “भारतीय संघात विराट कोहली सर्वात फिट प्लेयर आहे. त्याच्या वर्क एथेटिक्सशी कोणी सामना करु शकत नाही. तो आपल्या बेस्ट फॉर्म मध्ये परत येईल, या बद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. कोहलीची धावांची भूक आणि संयम अविश्वसनीय आहे”