Woman Asia Cup : भारतीय महिलांची विजयी सलामी, थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय

India vs Thailand Women : टीम इंडियाने थायलंडचा 94 धावांनी मोठ्या फरकाने पराभव केला. या सामन्यात शेफाली वर्माने तुफानी फलंदाजी करत 64 धावांची दमदार खेळी केली.

Woman Asia Cup : भारतीय महिलांची विजयी सलामी, थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय
india women beat thailand woman
Image Credit source: Google
| Updated on: Aug 30, 2026 | 11:47 PM

महिला आशिया कप स्पर्धा 2026 मधील आपल्या पहिल्याच सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने थायलंडचा 94 धावांनी मोठ्या फरकाने पराभव केला. या सामन्यात शेफाली वर्माने तुफानी फलंदाजी करत 64 धावांची दमदार खेळी केली. तसेच नंदिनी शर्मा आणि दीप्टी शर्माने प्रत्येकी 3-3 विकेट घेत भारताच्या विजयात मोलाचा हातभार लावला. या सामन्यात नेमकं काय घडलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारताच्या 159 धावा

आजच्या सामन्यात थायलंडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताची सुरुवात चांगली झाली नाही, स्टार सलामीवीर स्मृती मंधाना दुर्दैवी पद्धतीने धावबाद झाली. मात्र दुसऱ्या बाजून शेफालीने फटकेबाजी सुरू ठेवत भारताची धावसंख्या 100 च्या पुढे नेली. मात्र शेवटच्या 10 षटकांमध्ये भारताचे एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेले आणि भारतीय संघाला 20 षटकांत 159 धावांपर्यंतच मजल मारता आली.

भारताला तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर स्मृती मंधानाच्या रूपाने पहिला धक्का बसला. ती 10 चेंडूंमध्ये 19 धावा करून धावबाद झाली. त्यानंतर 91 धावांच्या स्कोअरवर भारताला दुसरा धक्का बसला. आपला पदार्पणाचा सामना खेळणारी प्रतिका रावल 18 चेंडूंमध्ये 22 धावा करून क्लीन बोल्ड झाली.कर्णधार हरमनप्रीत कौरलाही मोठी खेळी करता आली नाही. ती 9 चेंडूंमध्ये 5 धावा करून बाद झाली. त्यानंतर शेफाली वर्माने 36 चेंडूंमध्ये 64 धावांची आक्रमक खेळी केली. ती बाद झाल्यानंतर रिचा घोषही खाते न उघडता माघारी परतली. दीप्ती शर्मालाही फलंदाजीत विशेष काही करता आले नाही. ती 5 धावा करून धावबाद झाली.

थायलंडचा संघ अवघ्या 65 धावांत गारद

भारताने दिलेल्या 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना थायलंडचा डाव पूर्णपणे कोलमडला. थायलंडचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत गेले आणि संपूर्ण संघ 16.1 षटकांत अवघ्या 65 धावांवर ऑलआउट झाला. त्यामुळे भारताने हा सामना तब्बल 94 धावांनी जिंकला. थायलंडकडून यष्टिरक्षक फलंदाज नन्नापतने सर्वाधिक 41 धावा केल्या. भारताकडून नंदिनी शर्मा आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या, तर श्री चरणीला 2 आणि क्रांती गौडला 1 विकेट मिळाली.

दीप्ती शर्माच्या नावावर मोठा विक्रम

दीप्ती शर्माचा हा 150 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांच्यानंतर 150 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी ती तिसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. जागतिक स्तरावर 150 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी ती 12 वी महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

 

Follow Us